कालमर्यादा नाही म्हणून १२ सदस्यांची नेमणूक होणारच नाही का? संजय राऊतांचा सवाल  

आता मुंबई उच्च न्यायालयानेच विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त सदस्यांची यादी कुठे आहे, अशी विचारणा केली आहे. त्यामुळे त्याचे उत्तर राजभवनाला द्यावे लागणार आहे. घटनात्मक पदावर बसलेल्या महत्वाच्या व्यक्तीला हे शोभा देत नाही, असे शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले.

78

कुठल्या तरी वकिलाने सांगितले कि, विधान परिषदेतील राज्यपाल नियुक्त १२ सदस्य कधीपर्यंत नेमावेत, तशी कालमर्यादा दिलेली नाही, याचा अर्थ नेमणूकच करायची नाही, असे होत नाही. हा घटनेचा भंग आहे. या सदस्यांची नेमणूक झाली असती तर आज कोरोनाच्या काळात ते आमदार म्हणून काम करताना दिसले असते, असे शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले.

महत्वाच्या व्यक्तीला हे शोभा देत नाही! 

आता मुंबई उच्च न्यायालयानेच ती यादी कुठे आहे, अशी विचारणा केली आहे. त्यामुळे त्याचे उत्तर राजभवनाला द्यावे लागणार आहे. घटनात्मक पदावर बसलेल्या महत्वाच्या व्यक्तीला हे शोभा देत नाही. त्या १२ सदस्यांच्या यादीवर संशोधन सुरु आहे का? कुणाला यावर पीएचडी करायची असेल, तर तीही करून घ्यावी. आता तर ती यादीच राजभवनातून गायब झाल्याचे वृत्त आले आहे. ही यादी काय वादळात हरवून गेली कि भुताने नेली, असा सवालही संजय राऊत यांनी केला.

(हेही वाचा : राजभवनात भुताटकी, ती ‘भूतं’ कोण?)

महाराष्ट्रातील जनतेने तडफडून मरायचे का? 

तौक्ते वादळानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी फक्त गुजरातचा दौरा करतात आणि न मागता राज्याला १ हजार कोटीची मदत तात्काळ जाहीर करतात. मग महाराष्ट्राचा आक्रोश का ऐकू येत नाही? महाराष्ट्रातील जनतेने तडफडून मरायचे का? केंद्र व राज्य सरकार यांच्यात संघर्ष होता कामा नये, असेही राऊत म्हणाले.

सरकार काँग्रेसमुळेच, विस्मरण नाही! 

काँग्रेसशिवाय सरकार आहे, अशी शंका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना का यावी? हे सरकार बनवताना आम्ही आघाडीवर होतो. राहुल गांधी, सोनिया गांधी, प्रियंका गांधी यांच्याशी सुरुवातीपासूनच आमच्या चर्चा सुरु होत्या. त्यांच्या परवानगीनंतरच हे सरकार झाले आहे. त्यामुळे हे सरकार एकमेकांच्या मदतीने, सहकार्यानेच चालले आहे. याचे विस्मरण तिन्ही पक्षातील कोणालाही झालेले नाही, असे शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले. नाना पटोले यांनी आम्ही याआधीही अनेकदा सांगितले आहे की हे सरकार आमच्यामुळे आहे, आम्ही सरकारमुळे नाहीत. आमच्या नेत्यांनीही तेच सांगितले आहे. आमची सरकारमध्ये खूप सारी भागीदारी नाही, पण सगळ्यांचा समान विकास व्हायला हवा, असे म्हणाले होते. त्यावरही राऊत यांनी प्रतिक्रिया दिली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.