… म्हणून बच्चू कडूंना न्यायालयाने ठोठावला ५ हजारांचा दंड

159

आमदार आणि माजी राज्यमंत्री बच्चू कडूंना उस्मानाबाद न्यायालयाने ५ हजारांचा दंड ठोठावल्याचे समोर आले आहे. बच्चू कडू यांच्यासह अन्य तीन आरोपींना देखील हा दंड ठोठावण्यात आला आहे. शासकीय कामात अडथळा आणल्याच्या प्रकरणात त्यांना दंड ठोठावण्यात आला आहे.

(हेही वाचा – दिवाळीनंतर मुंबईत जमावबंदी लागू होणार, मुंबई पोलिसांचा निर्णय! काय आहे कारण)

तसेच जर या प्रकरणी होणाऱ्या पुढील सुनावणीला हजर न राहिल्यास जामीन रद्द करण्यात येईल, अशी तंबी देखील न्यायालयाने बच्चू कडूंना दिली आहे. १४ जानेवारी २०१९ पासून हे प्रकरण प्रलंबित असल्याने न्यायालयाने सुनावले आहेत. शासकीय कामात अडथळा केल्याप्रकरणी आमदार बच्चू कडू हे न्यायालयात हजर न झाल्याने उस्मानाबाद न्यायालयाने त्यांच्याविरोधात अटक वॉरंट काढले होते.

काय आहे प्रकरण

उस्मानाबाद जिल्हा परिषदेत आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनादरम्यान वाद झाला होता. हे प्रकरण १४ जानेवारी २०१९ पासून प्रलंबित आहे. याआधी २१ सप्टेंबर रोजी मंत्रालयातील कर्मचारी मारहाण प्रकरणात मुंबई सत्र न्यायालयाने आमदार बच्चू कडूंना नियमित जामीन मंजूर केला होता.

२०१८ मध्ये केलेल्या एका राजकीय आंदोलनाच्या गुन्ह्यात बच्चू कडू यांना गिरगाव दंडाधिकारी न्यायालयाने १४ दिवसांची न्यायलयीन कोठडी सुनावली होती. मात्र त्याच दिवशी मुंबई सत्र न्यायालयात धाव घेत बच्चू कडूंनी तात्पुरता जामीन मिळवला होता. त्यानंतर बच्चू कडूंनी नियमित जामीनासाठीही अर्ज केला होता. ज्यावर सुनावणी घेत न्यायधीश राहुल रोकडेंनी २१ सप्टेंबर रोजी या प्रकरणात त्यांना १५ हजारांच्या जातमुचलक्यासह जामीन मंजूर केला होता.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.