अरविंद केजरीवालांनी साधला ठाकरे सरकारवर निशाणा

113

अरविंद केजरीवाल यांनी नागपूरमधील एका कार्यक्रमात आम आदमी पक्षाचा 2024च्या लोकसभा निवडणुकीचा अजेंडा मांडताना महाराष्ट्रातील शाळा आणि रुग्णालयांच्या स्थितीवरुन महाराष्ट्र सरकार आणि उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. आम आदमी पक्ष हा राष्ट्रीय राजकारणात मोठी भूमिका बजावत आहे. आम आदमी पार्टीच्या पंजाबमधील विजयानंतर अरविंद केजरीवाल यांनी आपला मोर्चा महाराष्ट्राकडे वळवला आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीचा अजेंडा मांडताना महाराष्ट्रातील शाळा आणि रुग्णालयांच्या स्थितीवरुन महाराष्ट्र सरकार आणि उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

महाराष्ट्रातील शाळांची परिस्थिती वाईट

अरविंद केजरीवाल म्हणाले की, सध्या राजकारण म्हणजे भ्रष्टाचार, चोरी असे चित्र बनले आहे. पण आम्हाला गुंडगिरी, दंगे करता येत नाहीत. आम्हाला शाळा, रुग्णालये बनवता येतात. मी तुम्हाला दिल्लीत आमंत्रित करतो शाळा, महाविद्यालये पाहण्यासाठी दिल्लीत या. तेथील सुविधा पाहा. महाराष्ट्रत सरकारी शाळांची दुरवस्था झाली आहे. दिल्लीमध्येही तशीच परिस्थिती होती. मुले शाळेत येत नव्हती. मुले आली तरी परत जायची. शिक्षक शिकवत नव्हते. रिझल्टही वाईट यायचा. पण आता मात्र दिल्लीतील शाळा सुधारल्या आहेत. यावर्षी दिल्लीत चार लाख मुलांनी खासगी शाळांमधून दाखले काढून सरकारी शाळेत प्रवेश घेतला आहे. यात श्रीमंतांच्या मुलांचा समावेश आहे.

महाराष्ट्रात रुग्णालयांची स्थिती खराब

दिल्लीमध्ये आधी सरकारी रुग्णालयांची अवस्था वाईट होती. महाराष्ट्रातही सध्या तशीच परिस्थिती आहे. औषधे मिळत नाहीत. अनेक रुग्णालयात मशिनरी चांगली नाही. डाॅक्टर बाहेर उपचार करायला सांगतात. मात्र दिल्लीमध्ये ही परिस्थिती बदलली आहे. त्रिस्तरीय यंत्रणा सुरु केली आहे. मोहल्ला क्लिनिक सुरु केले आहे. तिथे एक डाॅक्टर बसवला आहे. चाचण्या, औषधे फ्री. त्यानंतर पाॅलिक्लिनीक येथे आठ डाॅक्टर असतात. आता दिल्लीत अशी परिस्थिती आहे की लोक मोठ्या हाॅस्पिटलमध्ये न जाता सरकारी रुग्णालयात जातात. दिल्लीत दोन कोटी लोक राहतात. आम्ही दिल्लीतील सर्वांवर मोफत उपचारांची घोषणा केली आहे, अशी माहिती अरविंद केजरीवाल यांनी दिली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.