शिवतीर्थावर मणिशंकर अय्यरनंतर राहुल गांधींना मारले ‘जोडे’

90
भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात येऊन तीन दिवस उलटले, तरी यात्रेला प्रसिद्धी मिळत नाही, हे लक्षात आल्यावर राहुल गांधी यांनी सवंग लोकप्रसिद्धीसाठी वीर सावरकर यांच्यावर टीका केली. अशा प्रकारे राहुल गांधी यांनी याआधीही अनेकदा सवंग प्रसिद्धीसाठी वीर सावरकर यांच्यावर टीका केली आहे. पण महाराष्ट्रात येऊन महाराष्ट्राचे सुपुत्र आणि क्रांतिकारकांचे स्फूर्तीस्थान वीर सावरकर यांच्यावर टीका केली आणि देशभर त्याचे पडसाद उमटले आहेत. मागील दोन दिवसांपासून राहुल गांधींवर चौफेर टीका होत आहे. शनिवार, १९ नोव्हेंबर रोजी बाळासाहेबांची शिवसेनेने थेट छत्रपती शिवाजी महाराज उद्यानातील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळासमोरच राहुल गांधी यांना ‘जोडे मारो’ आंदोलन केले.
बाळासाहेबांची शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी मंत्री दीपक केसरकर, आमदार सदा सरवणकर, आमदार यामिनी जाधव, प्रवक्ता शीतल म्हात्रे यांच्यासह अनेक शिवसैनिक उपस्थित होते, त्यांनी यावेळी राहुल गांधी यांच्या बनवलेल्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारले.

राहुल गांधींनी वीर सावरकरांवर आयुष्यभर बोलणे टाळावे

यावेळी बोलताना राहुल शेवाळे म्हणाले, वीर सावरकर यांचा अवमान केल्याप्रकरणी वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी तत्कलीन काॅंग्रेस सरकारमधील मंत्री मणिशंकर अय्यर यांना जे जोडे मारो आंदोलन केले होते, त्यांच्याच विचारांची परंपरा आम्ही पुढे नेत राहुल गांधी यांच्या विरोधात जोडे मारो आंदोलन केले आहे. राहुल गांधी यांनी महाराष्ट्रात येऊन महाराष्ट्राच्या पवित्र भूमीत महाराष्ट्राचे सुपुत्र स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा जो अपमान केला आहे तो बाळासाहेबांची शिवसेना कदापि सहन करणार नाही. कारण बाळासाहेबांनी नेहमीच वीर सावरकर यांच्या विचारांचा सन्मान केला आहे. तीच परंपरा आम्ही सगळे पुढे नेत आहोत. राहुल गांधी यांनी असे बोलायला नको आहे, महाविकास आघाडीच्या नेत्यांनी त्यांच्यावर दबाव टाकला असेल, हा दबाव त्यांच्यावर आयुष्यभर टाकावा, असे खासदार राहुल शेवाळे म्हणाले.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.