“गुजराती आणि राजस्थानी यांच्यामुळेच मुंबई आर्थिक राजधानी”; राज्यपालांचे वादग्रस्त वक्तव्य

105

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. मुंबई-ठाणे या शहरांतून गुजराती, राजस्थानींना काढून टाकले तर मुंबईकडे पैसेच उरणार नाही. मुंबई देशाची आर्थिक राजधानी राहणार नाही, असे वादग्रस्त विधान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबईतील एका कार्यक्रमात केले आहे. त्यामुळे राज्यपालांच्या या विधानावरुन नवा वाद निर्माण झाला आहे. राज्यपालांचे हे विधान म्हणजे महाराष्ट्राचा अपमान आहे. त्यामुळे राज्यपालांना नारळ देण्याची मागणी विरोधकांकडून करण्यात येत आहे.

साधा निषेध तरी करा …

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी यासंदर्भात एक ट्वीट केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्रात भाजप पुरस्कृत मुख्यमंत्री होताच मराठी माणूस आणि शिवरायांचा अपमान सुरु झाला. स्वाभिमान अभिमान यावर बाहेर पडलेला गट हे ऐकूनही गप्प बसणार असेल तर शिवसेनेचे नाव घेऊ नका. मुख्यमंत्री शिंदे राज्यपालांचा साधा निषेध तरी करा. मराठी कष्टकरी जनतेचा हा अपमान आहे, असे राऊतांनी म्हटले आहे.

( हेही वाचा: बाळासाहेब ठाकरे हिंदूंचे, केवळ ठाकरे कुटुंबाचे नाहीत )

काय म्हणाले राज्यपाल?

भारत देश हा शूरवीरांच्या बलिदानामुळे तसेच दानशूर लोकांच्या दातृत्वामुळे मोठा आहे, असे सांगताना त्याग, बलिदान व सेवा यामुळेच जनतेचे प्रेम मिळते आणि म्हणून सर्वांनी समाजासाठी आपले योगदान दिले पाहिजे, असे राज्यपालांनी सांगितले. मुंबई आणि ठाण्याच्या विकासात आणि विशेषत: मुंबईला देशाची आर्थिक राजधानी बनवण्यात राजस्थानी- गुजराती समाजांचे योगदान आहे. राज्यस्थानी आणि गुजराती यांना बाहेर काढले तर मुंबई आर्थिक राजधानी राहणार नाही. राजस्थानी- मारवाडी समाजाने व्यवसाय करताना केवळ अर्थसंचय न करता शाळा, महाविद्यालये, इस्पितळे बांधली व गोरगरिबांची सेवा केली. राजस्थानी मारवाडी समाज देशात सर्वत्र तसेच, नेपाळ, माॅरिशस आदी देशांमध्येदेखील आहे, असे सांगून जेथे जेथे हा समाज जातो तिथे तो आपला स्वभाव व दातृत्त्वामुळे स्थानिक संस्कृतीशी एकरुप होतो, असे राज्यपाल म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.