शेतकर्‍यांकडून अल्पदरात जमिनी खरेदी करून नफा कमवणारे रॅकेट कार्यरत

108

शासकीय प्रकल्पांसाठी भूसंपादीत करण्यात येणार्‍या जमिनी शेतकर्‍यांकडून अल्पदरात खरेदी करून शासनाकडून मिळणारा पाचपट मोबदला लाटण्यात येत असल्याचे प्रकार राज्यात घडत आहे. यामध्ये मोठे रॅकेट असल्याचा गंभीर प्रकार २४ डिसेंबर या दिवशी विधान परिषदेत सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी उपस्थित केला. पुणे-बडोदा महामार्गाकरीता भूसंपादीत करण्यात आलेल्या जमिनी शासकीय अधिकार्‍यांच्या नातेवाईकांनी खरेदी केल्याचा गंभीर आरोप या वेळी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला. सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनीही राज्यात असे प्रकारे घडत असल्याचे नमूद करत तक्रारी आलेल्या ठिकाणच्या प्रकल्पांच्या भूसंपादनाची चौकशी करण्याची सूचना महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना दिली.

पुणे-बडोदा महामार्गाकरीता ठाणे जिल्ह्यातील टिटवाळा परिसरातील चाळींची जागा संपादीत करण्यात आली मात्र प्रकल्पग्रस्तांना देण्यात येणारा मोबदला जागामालक हिरावून घेत आहेत, असा तारांकित प्रश्न शिवसेनेचे आमदार रवींद्र फाटक यांनी उपस्थित केला होता. या प्रश्नांवर विविध सदस्यांनी ही गंभीर समस्या सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. या वेळी सभागृहाचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी पुणे बडोदा महामार्गासाठी संपादीत करण्यात आलेल्या शासकीय अधिकार्‍यांच्या नातेवाईकांच्या नावे खरेदी करण्यात आल्याचा आरोप केला.

( हेही वाचा : “सरकारने ‘सी’ फॉर कोरोना नियंत्रण करण्याऐवजी ‘सी’ फॉर करप्शन केले” )

प्रकल्पांची चौकशी करणार

अशा प्रकारांमध्ये गरीबांच्या जमिनी कवडीमोल किमतीमध्ये घेऊन शासनाकडून मिळणारा ५ पट मोबदला लाटण्यात येत असल्याचा आरोप केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांनीही समृद्धी महामार्गात अशा प्रकारे भूसंपादन झाल्याचा आरोप केला. शेतकरी कामगार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी राज्यातील काही प्रकल्पांतील जमिनी दिल्ली आणि पंजाब येथील लोकांनी विकत घेतल्या असल्याचे सभागृहाच्या निदर्शनास आणले. यावर सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी हा प्रकार राज्यात सर्वत्र पसरला असून प्रारंभी ज्या ठिकाणी अधिक तक्रारी आहेत, त्या प्रकल्पांची चौकशी करण्याची सूचना केली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.