फडणवीसांची ‘समृद्धी’ आता ठाकरेंना झाली प्यारी

समृद्धी वरुन हे दोन्ही पक्ष एकमेकांची किती बरबादी करणार? याकडे आता महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.

73

राज्याचे नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकताच मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाचा पाहणी दौरा केला. पण त्यांच्या या पाहणी दौ-यानंतर आता शिवसेना-भाजपमध्ये श्रेयवादाचा वाद रंगला आहे. ज्या शिवसेनेने भाजप सरकारच्या काळात या समृद्धी महामार्गाला विरोध केला, तेच आता याचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका भाजपकडून करण्यात येत आहे.

आयत्या बिळावर नागोबा

राज्याचे नगर विकास मंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाची पाहणी केल्यानंतर, भाजपने शिवसेनेवर टीकास्त्र सोडले आहे. राज्यात देवेंद्र फडणवीस यांचे सरकार असताना, शिवसेनेकडूनच या महामार्गाला सर्वाधिक विरोध करण्यात आला होता. समृ्द्धी नव्हे, हा बरबादी मार्ग असल्याचे म्हणत, त्यावेळी शिवसेनेने राज्यात ठिकठिकाणी निदर्शने केली होती. त्यामुळे जे होते आधी बरबादीचे बोमकरी त्यांनाच आता व्हायचंय समृद्धीचे मानकरी, अशी टीका भाजप आमदार योगेश सागर यांनी शिवसेनेवर केली आहे. आयत्या बिळावर नागोबा असा असतो, असं ट्वीट करत त्यांनी शिवसेनेवर बोचरी टीका केली आहे.

(हेही वाचाः राज्यातील 12 जिल्ह्यांतून जाणारा ‘समृद्धी महामार्ग’ प्रगतीसाठी ‘बुस्टर डोस’! वाचा वैशिष्ट्यं)

खरे सारथी कोण?

या महामार्गाच्या पाहणी दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी या महामार्गावरुन स्वतः चारचाकी चालवत कामाच्या दर्जाचा आढावा घेतला. पण यांनी कितीही कल्ला केला, तरी समृद्धी महामार्गाचे खरे मानकरी हे फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीस आहेत, हे संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे. असंही योगेश सागर यांनी म्हटलं आहे.

त्यामुळे या दोन्ही पक्षांमधील श्रेयवादाचा हा वाद आता आणखी चिघळणार का, समृद्धी वरुन हे दोन्ही पक्ष एकमेकांची किती बरबादी करणार? याकडे आता महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.

(हेही वाचाः शिवसेना, भाजप पुन्हा एकत्र येणार? आदित्य ठाकरेंचं मोठं विधान)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.