“विकासाच्या नावाखाली जनतेची फसवणूक करणं पवारांची जुनी परंपरा”

103

मंगळवारी सत्ताधारी महाविकास आघाडीच्या मंत्र्यांनी महानगरपालिकेसह नगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणासह होतील, अशी ग्वाही दिली. राज्य निवडणूक आयोगाने ओबीसी आरक्षणाशिवाय प्रभागांची सोडत काढण्याचा कार्यक्रम जाहीर केल्याने राजकीय पक्ष आणि ओबीसी समाजात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी ओबीसी समाजाने आक्रमक होत भाजपाच्या नेतृत्वाखाली मंत्रालयावर मोर्चा काढला आहे. यामध्ये भाजपाचे मोठे नेते देखील हजर असून भाजपचे प्रदेशाध्यक्ष  चंद्रकांत पाटील यांनी पवारांसह महाविकास आघाडीवर चांगलाच निशाणा साधला आहे.

(हेही वाचा – संभाजीराजेंच्या उमेदवारीवर राऊतांचा पूर्णविराम; म्हणाले, “…विषय संपला”)

काय म्हणाले चंद्रकांत पाटील?

महाविकास आघाडी सरकारने ओबीसी समाजातील लोकांची फसवणूक केली आहे. मध्यप्रदेशात आरक्षण मिळू शकतं तर मग महाराष्ट्रात का नाही, असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. पुढे ते असेही म्हणाले की, शरद पवारांनी विकासाच्या नावाखाली जनतेची केवळ फसवणूक केली आणि गुळ दाखवला, ही त्यांची परंपरा आहे, असा खोचक टोलाही त्यांनी लगावला आहे. मात्र ओबीसी समाज आता याला बळी पडणार नाही. कारण महाविकास आघाडी सरकारला ओबीसींना आरक्षण द्यायचे नाही हे समजाला कळल्याने ते आक्रमक झाले आहे. म्हणून त्यांनी आज मुंबईत आंदोलन छेडले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

ओबीसी समाजाचा महाविकास आघाडी सरकारवर राग आहे. आरक्षणाच्या बाबतीत राज्य सरकारने ओबीसी समाजाची फसवणूक केली आहे. त्यामुळे त्यांनी आता भाजपाला आरक्षण मिळवून देण्यासाठी विनंती केली आहे. ओबीसी समाजाच्या मनात राग आहे. तो व्यक्त करण्यासाठी आणि राज्य सरकारला जाब विचारण्यासाठी बुधवारी ओबीसी समाज आक्रमक होत रस्त्यावर उतरला आहे, असेही चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. यावेळी भाजपतर्फे महाविकास आघाडीचा निषेध कऱण्यात आला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.