शरद पवारांच्या संमतीशिवाय पहाटेचा शपथविधीच होऊ शकत नाही; फडणवीसांनंतर आणखी एका नेत्याचा आरोप

138

२३ नोव्हेंबर २०१९ सालच्या पहाटे अचानक देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. आणि त्यानंतर महाराष्ट्रातील राजकारणात खळबळ माजली. देशभरात या शपथविधी सोहळ्याची चर्चा झाली. पण हे सरकार साडे तीन दिवसांत कोसळलं होत. या शपथविधीबाबत नुकताच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना गौप्यस्फोट केला. अजित पवारांसोबत झोलेल्या पहाटेच्या शपथविधीची राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांना पूर्ण कल्पना होती, किंबहुना त्यांच्या संमतीनंच सगळं झालं होतं, असं फडणवीस म्हणाले होते. त्यानंतर आता फडणवीसांच्या या विधानावर प्रतिक्रिया देताना भाजप नेते सदाभाऊ खोत यांनी पहाटेचा शपथविधी हा शरद पवारांचाच डाव असल्याचं सांगितलं आहे.

अजित पवार निर्णय घेऊ शकत नाहीत

पहाटेच्या शपथविधीबाबत फडणवीसांनी केलेल्या विधानावर बोलताना भाजप नेते, माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी शेतराखणीचं उदाहरण देत पवारांना टोला लगावला आहे. सदाभाऊ खोत म्हणाले की, ‘पहाटेच्या शपथविधीबाबत यापूर्वी मी माझी स्पष्ट भूमिका मांडली होती. माझी ती भूमिका अशी होती की, शरद पवारांच्या संमतीशिवाय पहाटेचा शपथविधीच होऊ शकत नाही. अजित पवार स्वतः निर्णय घेऊ शकत नाहीत. त्यामुळे शरद पवारांना शपथविधीबाबत माहित नाही, हे म्हणणं खोटं आहे.’

शेतराखणीचं उदाहरण देत पवारांना टोला

‘कसं असतं, ज्यावेळी शेतामध्ये पीक येत आणि पीक आल्यानंतर तिथं राखण्या बसवला जातो. राखण्या बसवला की, तो पाखरांना येऊ देत नाही. त्यामुळे पाखरांना प्रश्न पडतो की, आता बाबा दाणं खायचं कसं? मग पाखरं हुशार असतात, ती एक-दोन दिवस शेताकडं येतच नाहीत. मग राखण्याला वाटतं की, आता पाखरं यायची बंद झाली. त्यामुळे तो झोपून जातो. मग अचानक पाखरं येऊन हल्ला करून दाणं खाऊन जातात. तसं राष्ट्रपती राजवट राज्यावर लागल्यानंतर पवारांना कळलं, आता आपल्याला थोडं शांत रहावं लागेल आणि काहीतरी युक्ती करावी लागेल. त्याशिवाय हे दाणं खायला येत नाहीत. त्यामुळे त्यांनी देवेंद्र फडणवीस आणि भाजपवाल्यांना सांगितलं की, मी तुमच्याबरोबर सरकार बनवायला येतो, तुम्ही का चिंता करताय. अजित पवार येतील, उद्या शपथविधी घा. आणि रात्रीची राष्ट्रपती राजवट उठवली, राखण्या गेला आणि बरोबर दुसऱ्या दिवशी शरद पवार यांनी नेहमी ज्याप्रमाणे वागतात, त्या पद्धतीने वागले आणि शिवसेना, काँग्रेसला घेऊन सरकार बनवलं,’ असं खोत म्हणाले.

(हेही वाचा – सत्तासंघर्षाच्या सुनावणीदरम्यान चर्चेत असलेलं नबाम रेबिया प्रकरण काय आहे?)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.