महाराष्ट्र एटीएस झोपलंय का? शेलारांचा सवाल

67

नवरात्र, रामलीला अशा हिंदू सणांमध्ये घातपात करण्याच्या तयारीत असलेल्या दहशतवाद्यांना दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. यात महाराष्ट्रातून जान मोहम्मद शेखला धारावीतून स्पेशल सेलने अटक केली. मुंबईत आणि राज्यात अशी कटकारस्थानं सुरू असताना महाराष्ट्र राज्याचं दहशातवाद विरोधी पथक (एटीएस) झोपलंय का? असा सवाल भाजप नेते व आमदार आशिष शेलार यांनी केला आहे. पोलिसांवर असलेल्या राजकीय दबावामुळे त्यांचं अशा गोष्टींकडे दुर्लक्ष होतंय, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.

गृहमंत्र्यांनी उत्तर द्यावे

बुधवारी मुंबईत पत्रकारांशी संवाद साधताना शेलार यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले. नॅान कॅाग्निजेबल ॲाफेन्समधे केंद्रीय मंत्र्यांना अटक करणारे राज्याचे पोलिस, पत्रकारांना हात नाही पाय लाऊ अशी भाषा करणारे पोलिस, विद्यमान आमदाराला लूक आऊट नोटीस काढण्याचा प्रताप करणारे पोलिस दहशतवाद्यांच्या बाबतीत का झोपले होते, हे गृहमंत्री स्पष्ट करतील का? या दहशतवादी प्रकरणाची इंटेलिजन्स माहिती पोलिसांना, गृहमंत्र्यांना होती तर मग एका विशिष्ट वर्गाबाबत मवाळ भूमिका असं हे राजकीय प्रकरण नाही ना? असा सवाल करत पोलिसांच्या इंटेलिजन्स फेल्युअरवर गृहमंत्र्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

(हेही वाचाः जान मोहम्मदच्या वरच्या खोलीचे काय आहे रहस्य?)

पोलिसांवर राजकीय दबाव

आता सरकार बैठका घेत असलं तरी झालेल्या अक्षम्य दुर्लक्षावर आता पांघरुण घालता येणार नाही. राज्यकर्ते पोलिसांचं लक्ष नको त्या विषयात घालतात मग अशा घटना घडतात. आमचे पोलिस सक्षम आहेत, पण राजकीय दबाव, सरकारची गटबाजी, वसुलेबाजी, आणि सौदेबाजी यामुळे ही स्थिती आली असंही ते म्हणाले. चौकशी अजून वाढवावी आणि गृहमंत्र्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, असे आवाहन शेलार यांनी केले आहे.

(हेही वाचाः दहशतवाद्यांचा कट : मुंबई रेल्वे स्थानकांची केलेली रेकी! गृहमंत्र्यांची उच्च स्तरीय बैठक)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.