‘सांग सांग भोलानाथ… हा दंड पेंग्विन सेनाप्रमुखांकडून वसूल करायचा का?’, शेलारांचा आदित्य ठाकरेंवर निशाणा

110

मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार हा आता चांगलेच आक्रमक झाले असून त्यांनी मुंबई महापालिकेत होणा-या भ्रष्टाचारावरुन उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेवर जोरदार टीका करायला सुरुवात केली आहे. त्यातच आता राष्ट्रीय हरित लवादाने ठोठावलेल्या दंडानंतर शेलार यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर देखील जोरदार निशाणा साधला आहे. हा दंड आता पेंग्विन सेनाप्रमुखांकडून वसूल करायचा का?, असा खोचक सवाल भाजप आशिष शेलार यांनी केला आहे.

राष्ट्रीय हरित लवादाने ठोठावला दंड

कचरा व्यवस्थापनात अपयशी ठरल्यामुळे पर्यावरणाची हानी झाली आहे. त्यामुळे याबाबत राष्ट्रीय हरित लवादाने महाराष्ट्र सरकारला 12 हजार कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. हा दंड दोन महिन्यांत भरण्याचे निर्देश राज्य सरकारला देण्यात आले आहेत. प्रदूषणमुक्त वातावरण देणे ही राज्य सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांची घटनात्मक जबाबदारी आहे असे देखील लवादाने यावेळी म्हटले आहे. त्यावरुन आशिष शेलार यांनी ट्वीट करत आदित्य ठाकरे आणि मुंबई महापालिकेवर निशाणा साधला आहे.

(हेही वाचाः शरद पवार आणि उद्धव ठाकरेंमध्ये होणार महत्वपूर्ण बैठक, काय आहे कारण? चर्चांना उधाण)

शेलारांचा खोचक सवाल

हा दंड दोन महिन्यात भरायचा आहे, मग आता.. सांग सांग भोलानाथ… हा दंड पालिकांमधे सत्ता असलेल्यांकडून, अडीच वर्षे पर्यावरण मंत्री असलेल्यांकडून, सोशल मीडियावर “पर्यावरण प्रेमाची झाडे लावणाऱ्या” पेंग्विन सेनाप्रमुखांकडून वसूल करायचा का?, असा खोचक सवाल करत आशिष शेलार यांनी आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.