‘पर्यावरणाच्या नावाखाली विना निमंत्रण पर्यटनमंत्र्यांची स्कॉटलंड वारी’

81

राज्यभरात एसटी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप सुरूच आहे. अद्यापही एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर महाविकास आघाडी विरुद्ध भाजप नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू आहे. दरम्यान, भाजपचे कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांनी याच मुद्द्यावरुन पर्यावरण आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

एसटी कर्मचारी उपाशीपोटी काम करी, अन्…

स्कॉटलंड देशातील ग्लास्गो येथे आयोजित पर्यावरण बदल परिषदेस (सिओपी-26) कोणतेही अधिकृत निमंत्रण नसतानाही राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी पर्यावरणाच्या नावाखाली निकटच्या अधिकाऱ्यांना सोबत घेत पर्यटन करण्याचे काम चालविले आहे. त्यामुळे “इकडे एसटी कर्मचारी उपाशीपोटी काम करी, अन् आदित्य ठाकरेंची पर्यावरणाच्या नावाखाली विना निमंत्रण जनतेच्या पैशावर स्कॉटलंड वारी” अशी टीका भातखळकर यांनी केली आहे.

(हेही वाचा – वानखेडेंची बदनामी : दोन्ही बाजूंची कागदपत्रे न्यायालयाने स्वीकारली)

पर्यटन दौऱ्याचा खर्च वसूल करण्याची मागणी

मिळालेल्या माहितीनुसार, ​या परिषदेला फक्त देशाच्या प्रमुखांनाच परवानगी असते. असे असतानाही आदित्य ठाकरे हे कोणत्या अधिकारात ग्लास्गोला गेले होते? त्याचे त्यांना निमंत्रण होते का? राज्यात मागील तीन आठवड्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु असताना परिवहन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार यांना सहकुटुंब सोबत घेऊन जाण्याचे कारण काय? पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह अधिकाऱ्यांचा खर्च जनतेच्या पैशातून का करण्यात आला? एवढा लवाजमा सोबत नेत आदित्य ठाकरे यांनी त्या परिषदेतून महाराष्ट्रासाठी काय आणले? असा सवाल भातखळकर यांनी केला आहे. तसेच या संपूर्ण पर्यटन दौऱ्याचा खर्च हा आदित्य ठाकरे यांच्याकडूनच वसूल करावा, अशी मागणही भातखळकर यांनी ठाकरे सरकारकडे केली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.