महापालिका शाळांच्या मुलांनी शालेय साहित्य कसे न्यायचे? दप्तर खरेदीला विलंब  झाल्याने भाजपची चौकशीची मागणी

120
मुंबई महापालिकेच्या शाळा सुरू झाल्या असून पहिल्याच दिवशी पाठयपुस्तकांचे वाटप विद्यार्थ्यांना करण्यात आले आहे. परंतु ही पुस्तके शाळेत घेऊन येण्यासाठी दप्तरच देण्यात आले नाही. २७ शालेय वस्तूंपैकी दप्तर वगळता अन्य वस्तूंची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून केवळ दप्तर खरेदीची प्रक्रिया आजही निविदा प्रक्रियेतच अडकली आहे. त्यामुळे मुलांनी आपले शालेय साहित्य कशातून आणावे? असा सवाल भाजपचे आमदार नितेश राणे यांनी महापालिका आयुक्त तथा प्रशासकांना केला आहे. एका मंत्र्याच्या जवळच्या व्यक्तीला कंत्राट देण्यासाठी हा खटाटोप केला गेला जात असून, याच करता १४ वेळा शुद्धी पत्रके काढण्यात आल्याचा आरोप राणे यांनी केला आहे. त्यामुळे महापालिका शाळांमधील मुलांची दप्तरे कुणामुळे अडकली असा प्रश्न उपस्थित होत आहे.
मागील काही वर्षांपासून शाळेच्या पहिल्याच दिवशी मुलांना २७ शालेय साहित्य उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न शिक्षण विभागाच्या माध्ममातून सुरु आहे. परंतु यंदा महापालिकेच्या शाळा १३ जूनपासून खुल्या झाल्या आहेत. परंतु अद्यापही शाळांमध्ये वाटप करण्यात येणाऱ्या शालेय वस्तू पोहोचलेल्या नाहीत, असे भाजप आमदार नितेश राणे यांनी महापालिका आयुक्त व प्रशासक इक्बाल सिंह चहल यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

महापालिकेला 14 वेळा शुध्दीपत्रके काढावी लागली

मुलांसाठी खरेदी करण्यात येणाऱ्या २७ शालेय वस्तूंपैंकी काही वस्तूंच्या  खरेदीची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे आणि ते प्रस्ताव प्रशासकांच्या मान्यतेसाठी पाठवल्याची माहिती मिळत आहे. परंतु अद्यापही दप्तराची निविदा प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. या सर्व वस्तूंच्या खेरदीप्रमाणे फेब्रुवारीत दप्तरांसाठीही निविदा मागवली होती, परंतु फेब्रुवारीपासून ते जूनपर्यंत केवळ  निविदेबाबत शुध्दीपत्रके जारी केली जात आहेत. अगदी ३ जूनपर्यंत तब्बल १४ शुध्दीपत्रके या दप्तर खरेदीबाबत काढण्यात आली आहेत. ही शुध्दीपत्रके केवळ सरकारमधील महापालिकेत सत्ता असलेल्या एका मंत्र्याच्या जवळच्या व्यक्तीला कंत्राट देण्यासाठी काढण्यात आली. या मंत्री महोदयांच्या उद्योगामुळे महापालिकेला १४ वेळा शुध्दीपत्रके काढावी लागली, असे म्हटले आहे.
सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांतर्गत एस.सी व एस.टी वर्गाला २० टक्के राखीव काम देण्यासाठीची ही शुध्दीपत्रके होती. यामध्ये जो कोणी कंत्राटदार या दत्पराच्या कंत्राटासाठी पात्र ठरेल, त्यातील २०टक्के दप्तरांचा पुरवठा करण्याचे काम या संस्थेला देण्यासाठी वारंवार निविदेमध्ये सुधारणा केल्या. ज्यामुळे निविदा प्रक्रियेला विलंब होऊन मुलांना दत्पर मिळण्यास दिवाळी उलटून जाणार आहे. सदर दप्तरे ही जर मुलांना दिवाळीनंतर मिळणार असतील, तर मुलांनी शाळेत काय घेऊन जावे आणि आपण जे शालेय साहित्य देणार आहात ते कशातून शाळेत आणावे असा सवाल नितेश राणे यांनी केला आहे.

म्हणून मुलांना नियोजित वेळेत दप्तर नाहीत

मुलांना ही दप्तरे वेळीच मिळणे आवश्यक आहे, परंतु प्रशासन  कुणाच्या तरी दबावाखातर काम करत असल्याने, दप्तरे मिळण्यास विलंब होणार आहे. यामध्ये जर सुक्ष्म,लघु व मध्यम उद्योगांतर्गत काम  एखाद्या संस्थेला द्यायचे असेल तर ते यापूर्वीच करायला हवे होते, निविदा काढल्यानंतर त्यांना सामावून घेण्याचा प्रयत्न केल्याने मुलांना नियोजित वेळेत दत्परे मिळणार नाहीत आणि यासाठी जर दोन कंपन्या नेमल्या तर त्या दप्तराच्या दर्जाबाबतही प्रश्न उपस्थित होतो. त्यामुळे या सर्व विलंबाबाबत त्वरीत चौकशी करून निविदा प्रक्रिया पाडावी आणि सुक्ष्म,लघु व मध्यम उद्योग संस्थांना  निविदेत सामावून घेण्याचे धोरण नसल्याने त्यासाठी धोरण जाहीर करण्यात यावे, अशी सूचना केली आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.