‘मग शिवसेना माझी म्हणायला हवी’, उदयनराजेंचं मोठं विधान

95

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेतील आमदार,खासदारांनी उठाव केल्यानंतर शिवसेनेत उभी फूट पडली आहे. आपल्याकडे शिवसेनेतील सर्वाधिक आमदार, खासदारांचे पाठबळ असल्यामुळे खरी शिवसेना ही आपलीच असल्याचा दावा हा शिंदे गटाकडून करण्यात येत आहे. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे यावरील निकालाकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

पण आता याचबाबत भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांनी मोठे विधान केले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने स्थापन झालेली शिवसेना ही माझी म्हणायला हवी, असे विधान करत त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला टोला लगावला आहे.

काय म्हणाले उदयनराजे?

शिवसेना पक्ष कोणाचा, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. मग आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने स्थापन झालेली शिवसेना माझी आहे, असं मी म्हणायला हवं. महाराष्ट्र माझा आहे, असं म्हणालयला हवं. हा संपूर्ण महाराष्ट्र हा लोकशाहीतील लोकांचा आहे. कारण लोकांकडून आमच्यासारखे लोकप्रतिनिधी हे निवडून देण्यात येतात. त्यामुळे महाराष्ट्र हा छत्रपती शिवरायांचा आणि लोकांचा आहे, असे विधान खासदार उदयनराजे भोसले यांनी केले आहे.

(हेही वाचाः )

स्वार्थाने एकत्र आलेले टिकत नाहीत

तसेच महाविकास आघाडीमधील नाराजीबाबतही उदयनराजे भोसले यांनी भाष्य केले आहे. ज्यावेळी पक्षातील लोक हे स्वार्थ मनात ठेऊन एकत्र येतात तेव्हा त्यांना एकत्र ठेवणं हे फार अवघड असतं. जेव्हा त्यांचा स्वार्थ साध्य होतो तेव्हा ते आपआपल्या मार्गाने निघून जातात. पण ज्यावेळी लोक हे एका विचाराने एकत्र येतात त्यांना एकत्र ठेवण्यासाठी कुठल्याही ताकदीची गरज नाही. त्यामुळे आता राज्यात एकत्र आलेले युतीचे सरकार हे कायमस्वरुपी राहणार असल्याचे उदयनराजे भोसले यांनी स्पष्ट केले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.