आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात ‘भाजप’चं ढाक्कुमाक्कुम… ढाक्कुमाकुम..!

105

शिवसेनेत फूट पाडल्यानंतर आता भाजपने मुंबई महापालिकेवर लक्ष्य केंद्रित केले आहे. त्याची सुरूवात शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघातून करण्यात येणार असल्याचे दिसतेय. दरम्यान, भाजपचे नेते आशिष शेलार यांनी मुंबई भाजपची जबाबदारी स्वीकारली आणि थेट आदित्य ठाकरेंच्या मतदार संघाकडे आपले लक्ष वळविल्याचे सांगितले जात आहे. अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेताच आशिष शेलारांनी वरळीत भव्य दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले आहे. जांबोरी मैदानात हा उत्सव पार पडणार असून दहीहंडी उत्सवाच्या माध्यमातून आशिष शेलार महापालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकणार असल्याचे म्हटले जात आहे. तर या दहीहंडी उत्सवाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

(हेही वाचा – पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला एकनाथ शिंदेंचं ठाकरेंच्या शिवसेनेला पत्र, म्हणाले…)

वरळीतील कोळी बांधवांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी भाजपचे प्रयत्न आहेत. मात्र कोळी बांधवांना आपल्याकडे खेचून आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघाला सुरूंग लावतानाच पालिकेत वरळीतून जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्याचीही भाजप खेळी करत असल्याचे विरोधकांकडून म्हटले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आशिष शेलार यांचे निकटवर्तीय संतोष पांडे यांनी या दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले आहे. वरळीतील जांबोरी मैदानात शुक्रवारी दहीहंडी उत्सवाचे आयोजन होणार असून या उत्सवाला कसा प्रतिसाद मिळणार? याची उत्सुकता आता लागून राहिली आहे.

वरळीत रंगणार भव्य दहीहंडी उत्सव

दरवर्षी वरळीच्या जांबोरी मैदानात शिवसेना नेते आणि आमदार सचिन आहिर हे दहीहंडी उत्सवाचे आयोजन करत असतात. पण यंदा पहिल्यांदाच भाजपने सर्वात आधी जांबोरी मैदान पटकावून आहिर यांच्यावर मात केली आहे. त्यामुळे आता शिवसेनेकडून दहीहंडी उत्सव आयोजनासाठी जांबोरी मैदान परिसरात नव्या जागेचा शोध सुरू करण्यात येत आहे. त्यामुळे यंदाच्या दहीहंडी उत्सवात पहिल्यांदा शिवसेना आणि भाजपचा भव्य दहीहंडी उत्सव पाहायला मिळणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.