भाजपची सिंहांवर ‘कृपा’… आता मिळणार आमदारकी?

कृपाशंकर सिंह यांना विधान परिषदेवर पाठवून, उत्तर भारतीय मतदारांकडे भाजपने लक्ष केंद्रित केल्याची माहिती मिळत आहे.

73

काँग्रेसचे माजी मुंबई अध्यक्ष आणि माजी राज्यमंत्री कृपाशंकर सिंह यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश करत काँग्रेसला रामराम ठोकला आहे. त्यानंतर कृपाशंकर सिंह यांना भाजप काय जबाबदारी देणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. मात्र पालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवत भाजप कृपाशंकर सिंह यांना विधान परिषदेवर पाठवण्याच्या तयारीत आहे. डिसेंबर महिन्यात विधान परिषदेच्या दोन जागांसाठी निवडणूक होणार असून, यावेळी कृपाशंकर सिंह यांना विधान परिषदेवर पाठवून, उत्तर भारतीय मतदारांकडे भाजपने लक्ष केंद्रित केल्याची माहिती मिळत आहे.

नगरसेवक करणार मतदान

डिसेंबरमध्ये होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीसाठी नगरसेवक मतदान करणार असून, भाजपकडे 83 नगरसेवकांचे संख्याबळ आहे. महत्त्वाचे म्हणजे पहिल्या पसंतीची 77 मते मिळालेला उमेदवार विधान परिषदेवर सहज निवडून येतो. त्याचमुळे भाजपचा हा विजय निश्चित मानला जात असून, भाजपने या जागेसाठी कृपाशंकर सिंह यांच्याच नावाला पसंती दिल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळत आहे.

(हेही वाचाः उत्तर भारतीयांची ‘कृपा’ भाजपवर होणार का?)

यांनाही हवी आहे आमदारकी

सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे भाजपने कृपाशंकर सिंह यांच्या नावाचा विचार केलेला असताना, माजी आमदार राजहंस सिंह हे देखील विधान परिषदेसाठी इच्छुक आहेत. मात्र सध्या कृपाशंकर सिंह यांचे पारडे जड मानले जात असून, कृपाशंकर सिंह हे देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे मानले जात असल्याने, त्यांच्या नावाचा विचार होण्याची दाट शक्यता आहे. दरम्यान राज्य नेतृत्वाकडून या निवडणुकीसाठी काही इच्छुकांची नावे दिल्लीत पक्ष नेतृत्वाकडे पाठवली जातील. त्यातून एकाची अंतिम निवड दिल्लीतून होईल, असे देखील सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

म्हणून कृपांना पसंती

राज्यात महाविकास आघाडी सत्तेत आल्यानंतर भाजपचा एकमेव अजेंडा आहे, तो म्हणजे शिवसेनेच्या ताब्यात असलेली मुंबई महापालिका सेनेच्या हातातून हिरावून घेण्याची. त्याचमुळे आता भाजपने सर्व मतदारांवर लक्ष केंद्रित केले असून, मुंबईतील उत्तर भारतीय मतदारांची संख्या लक्षात घेता कृपा यांना आता भाजप मैदानात उतरवणार आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत कृपाशंकर सिंह यांच्या खांद्यावर उत्तर भारतीय मतदारांची जबाबदारी दिली जाणार असून, येत्या काही दिवसांत उत्तर भारतीयांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

(हेही वाचाः महापालिका निवडणुकीच्या तोंडावर कृपाशंकर सिंह यांचा भाजपप्रवेश!)

उत्तर भारतीयांची मते निर्णायक

मुंबईमध्ये सुमारे 40 ते 50 लाख उत्तर भारतीय मतदार आहेत. उत्तर भारतीयांच्या मतांची टक्केवारी 20 ते 25 टक्के आहे. मुंबईतील अनेक मतदारसंघांत उत्तर भारतीयांची मते निर्णायकही ठरत आहेत. या उत्तर भारतीय मतदारांमध्ये कृपाशंकर सिंह यांची लोकप्रियता आहे. त्याचमुळे कृपाशंकर सिंह यांना विधान परिषदेची आमदारकी देण्याचा विचार भाजप करत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.