कंगनाची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली! आता पुढे काय?

कंगनाची कलम २०२ अंतर्गत चौकशी सुरु आहे. या अंतर्गत ६ महिन्यांच्या कारावासाची तरतूद आहे.

87

अभिनेत्री कंगना राणावत हिने तिच्याविरोधात संगीतकार जावेद अख्तर यांनी दाखल केलेला गुन्हा रद्द करण्याच्या मागणीसाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती, मात्र न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावल्यामुळे कंगनाच्या अडचणीत वाढ होणार आहे. त्यामुळे आता कंगना एक सदस्यीय खंडपीठाच्या निर्णयाला उच्च न्यायालयातच दोन सदस्यीय खंडपीठासमोर जाऊ शकते, अथवा सर्वोच्च न्यायालयात धाव घ्यावू शकते. कंगनाविरोधात फौजदारी कारवाईची मागणी अख्तर यांनी केली आहे.

अंधेरी न्यायालयाचा निर्णय कायम!

जावेद अख्तर यांनी अंधेरी न्यायालयात तक्रार केली होती. त्यावेळी न्यायालयाने यांची दाखल घेत कंगनाच्या विरोधात वॉरंट काढला होता. त्यावर कंगना राणावत हिने अंधेरी न्यायालयाच्या आदेशाला उच्च न्यायालयात आव्हान दिले. त्यावर न्यायमूर्ती रेवती मोहिते यांनी ही याचिका फेटाळून लावली. यावेळी कंगना राणावत हिचे वकील रिझवान सिद्दीकी यांनी युक्तीवाद केला. त्यावेळी अंधेरी न्यायालयाने जावेद अख्तर यांनी दाखल केलेल्या तक्रारींवर कोणत्याही प्रकारची चौकशी केली नाही, अथवा साक्षीदारांची उलट तपासणी केली नाही, असे म्हटले. त्यामुळे अंधेरी न्यायालयाच्या आदेशानुसार जुहू पोलिस कलम २०२ अंतर्गत चौकशी करत आहे, हे चुकीचे आहे, असे वकील सिद्दीकी म्हणाले. मात्र न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली.

सहा महिन्याच्या कारावासाची तरतूद!

कंगनाची कलम २०२ अंतर्गत चौकशी सुरु आहे. एखाद्याच्या विरोधात जाणीवपूर्वक बदनामीकारक केलेले गैरकृत्य प्रकरणी या कलमांतर्गत कारवाई होत असते, त्यासाठी ६ महिन्यांच्या कारावासाची तरतूद आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.