Byculla Vidhan Sabha : उबाठा सोबत काँग्रेसचाही डोळा ‘या’ मतदारसंघावर

99
Byculla Vidhan Sabha : उबाठा सोबत काँग्रेसचाही डोळा 'या' मतदारसंघावर
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई

दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातील भायखळा विधानसभा (Byculla Vidhan Sabha) आता शिवसेनेच्या यामिनी जाधव यांना जड जाणार असल्याची शक्यता वर्तवली जात असून या मतदारसंघावर महाविकास आघाडीचा पूर्ण डोळा आहे. महाविकास आघाडीमध्ये या मतदारसंघामध्ये उबाठा शिवसेनेचा दावा असला तरी काँग्रेसनेही हा मतदारसंघ आपल्याकडे यावा यासाठी ताकद लावली आहे. त्यामुळे उबाठा शिवसेनेचा दावा असला तरी काँग्रेसचे वरिष्ठ नेते मधु चव्हाण यांच्यासह काँग्रेस पक्षाच्या नेत्यांचा दावा असल्याचेही बोलले जात आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत उबाठा शिवसेनेच्या वाट्याला दक्षिण मुंबई मतदारसंघ आल्यानंतर भायखळा विधानसभेच्या आमदार यामिनी जाधव यांना शिवसेनेकडून उमेदवारी देण्यात आली. परंतु या निवडणुकीत उबाठा शिवसेनेचे अरविंद सावंत यांचा विजय झाला आणि जाधव यांना ५२ हजार ६७३ मतांनी पराभव पत्करावा लागला.

परंतु जाधव यांच्या स्वत:च्या विधानसभा क्षेत्रात म्हणजे भायखळ्यात विद्यमान आमदार असूनही यामिनी जाधव यांना केवळ ४०, ८१७ मते आणि उबाठाचे अरविंद सावंत यांना ८६, ८८३ मते मिळाली. त्यामुळे स्वत:च्या मतदारसंघातच यामिनी जाधव या ४६ हजार मतांनी मागे पडल्या आणि सावंतांना आघाडी मिळाली. या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातील मुस्लिमांनी यामिनी यांच्या बाजूने भरभरुन मतदान करत त्यांना निवडून आणले होते. लोकसभेला नेमके मुस्लिम मतदार हे जाधव यांच्यासोबत राहिले नाहीत. त्यामुळे स्वत:च्या मतदारसंघात आघाडी घेण्याऐवजी यामिनी जाधव या ४६ हजार मतांनी पिछाडीवर गेल्याने त्यांना पराभव पत्कारावा लागला. (Byculla Vidhan Sabha)

(हेही वाचा – MSEB : ‘मराविम’ ऑनलाइन माहितीच्या अधिकारात समाविष्ट का नाही? कर्मचारी-अभियंत्यांचा संताप)

उबाठा शिवसेनेकडून ‘हे’ आहेत एकमेव दावेदार 

त्यामुळे भायखळा विधानसभेवर (Byculla Vidhan Sabha) उबाठा शिवसेनेचा डोळा असून महाविकास आघाडी कायम राहिल्यास हा मतदारसंघ उबाठा शिवसेनेच्या वाट्याला जाईल आणि याठिकाणी उबाठा शिवसेनेचे उपनेते मनोज जामसुतकर यांना उमेदवारी मिळेल असे बोलले जात आहे. परंतु या मतदारसंघातील मताधिक्य पाहता तसेच उबाठा शिवसेनेची साथ लक्षात घेता काँग्रेसनेही या मतदारसंघावर दावा करण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेसचे मधु (अण्णा)चव्हाण यांच्याकडून या मतदारसंघावर दावा केला जात आहे. वयोमानानुसार मधु चव्हाण हे निवडणूक लढवणार नसले तरी त्यांचा मुलाला उमेदवारी मिळावी म्हणून त्यांच्याकडून प्रयत्न सुरु आहे. मात्र, या मतदारसंघात काँग्रेस आणि उबाठा यांच्यात वाद झाल्यास अंतिमत: ही जागा उबाठा शिवसेनेलाच सुटू शकते असेही बोलले जात आहे.

उबाठा शिवसेनेकडून एकमेव दावेदार हे मनोज जामसुतकर हे असून जामसुतकर उभे राहिल्यास जाधव यांच्यासमोर तगडे आव्हान निर्माण करू शकतात. आजवर जाधव यांच्या विरोधात रमाकांत रहाटे असले तरी आता जामसुतकर हेही सोबत असल्याने रहाटेंचीही ताकद वाढली आहे. जामसुतकर हे उपनेते असल्याने तसेच महाविकास आघाडी झाली नाही तरीही ते मराठी आणि मुस्लिमांची मते आपल्या पारड्यात पाडून घेत यशवंत जाधव आणि विद्यमान आमदार यामिनी जाधव यांच्यासमोर आव्हान निर्माण करू शकतात असे बोलले जात आहे. त्यामुळे जामसुतकर हे निवडणूक रिंगणात उतरल्यास जाधव यांना ही निवडणूक अधिक जड जाण्याचीही शक्यता वर्तवली जाहे. मात्र, दुसरीकडे मनसेच्यावतीने संजय नाईक यांचेही नावे चर्चेत असून नाईक हे उभे राहिल्यास तिघांमध्ये जामसुतकर हेच सरस ठरु शकतात, असे भायखळ्यातील रहिवाशांचे म्हणणे आहे. (Byculla Vidhan Sabha)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.