राज्याचे मुख्य सचिव आणि पोलिस महासंचालकांना सीबीआयचे समन्स! काय आहे कारण?

मात्र या दोघांनीही चौकशीला हजर राहण्यास नकार दिला आहे.

63

परमबीर सिंह यांनी 100 कोटींच्या कथित वसुलीच्या आरोपाची सीबीआयकडून चौकशी करण्यात येत आहे. यामध्ये आतापर्यंत अनेकांना सीबीआयने चौकशीसाठी बोलावले असून, आता राज्याचे पोलिस महासंचालक संजय पांडे आणि राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना सीबीआयकडून समन्स बजावण्यात आले आहे. मात्र या दोघांनीही चौकशीला हजर राहण्यास नकार दिला आहे.

का पाठवले समन्स?

100 कोटींच्या वसुली प्रकरणात साक्ष देण्यासाठी म्हणून सीताराम कुंटे आणि संजय पांडे यांना सीबीआयकडून हे समन्स पाठवण्यात आले असल्याचे समजते. मात्र या दोन्ही अधिका-यांनी चौकशीसाठी सीबीआय कार्यालयात जाण्यास नकार दिला आहे. यापूर्वी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा करण्यात आली होती. त्यामुळे जबाब नोंदवायचा असल्यास आपल्या कार्यालयात येण्याची विनंती या दोन्ही अधिका-यांनी सीबीआयला केली आहे.

राज्य सरकार सहकार्य करत नसल्याचा सीबीआयचा दावा

यापूर्वी जून महिन्यात या वसुली प्रकरणाच्या चौकशीत राज्य सरकार आपल्याला सहकार्य करत नसल्याचे सांगत सीबीआयने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. सीबीआयने अनिल देशमुख यांच्याविरुद्ध दाखल केलेल्या एफआयआर मधील काही मुद्दे वगळावेत यासाठी राज्य सरकारने न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर झालेल्या सुनावणीत राज्य सरकार तपासात सहकार्य करत नसल्याचा आरोप सीबीआयने केला होता.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.