Maharashtra Assembly session: “…पण ५० आमदारांनी माझ्यावर विश्वास दाखवला हे माझं भाग्य”

101

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नव्या विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे अभिनंदन केले. यावेळी राहुल नार्वेकर हे महाराष्ट्र विधानसभेचे सर्वात तरूण अध्यक्ष म्हणून निवडून आल्याने त्यांनी त्यांचे कौतुक केले. विधिमंडळातील पहिली लढाई भाजपने जिंकली असून सत्तेतून पायउतार होत आम्ही हे पाऊल उचलले आहे. राज्यात शिवसेना-भाजपचे सरकार स्थापन झाले असल्याचे शिंदेंनी यावेळी म्हटले.

काय म्हणाले एकनाथ शिंदे?

आज मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंचं विधिमंडळातील पहिलंच भाषण होतं. यावेळी राज्यात गेल्या काही दिवस सुरू असलेल्या सत्ता संघर्षात आमदारांना अनेक प्रलोभन दाखवली गेली पण ५० जण एकत्र आले आणि माझ्यावर विश्वास दाखवला, साथ दिली ते माझे भाग्य असल्याचे त्यांनी सांगितले.

(हेही वाचा – Maharashtra Assembly session: महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर)

देशानं या घटनेची नोंद घेतली

राज्याच्या विधानसभा अध्यक्ष पदाची गौरवशाली परंपरा असून पारदर्शक पद्धतीने आम्हाला राज्याचा कारभार चालवणार आहोत. आतापर्यंत अध्यक्षांनी पदाची प्रतिष्ठा जपली आहे, आताही ती जपली जाईल, असा विश्वास देखील एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला आहे. तर विरोधकांवर निशाणा साधताना ते म्हणाले, एकीकडे राज्यातील मोठे नेते होते तर दुसरीकडे बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे यांचा शिवसैनिक होता, मात्र असे असूनही विजय आमचा झाला आणि देशाने या घटनेची नोंद घेतली आहे.

…हे माझे भाग्य समजतो

एकनाथ शिंदेंनी शिवसेनेविरोधात बंड पुकारला. यावर भाष्य करताना शिंदे म्हणाले, माझ्यासह ८ मंत्री सत्तेतून पायउतार झाले. मला ५० आमदारांनी साथ दिली. माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यावर आमदारांनी विश्वास ठेवला हे माझे भाग्य समजतो. कोणावरही जोरजबरदस्तीचा प्रयत्न झाला नाही. दरम्यान, भाजपाने आपल्या मनाचा मोठेपणा दाखवून मला मुख्यमंत्री करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यामुळेच राज्यात शिवसेना-भाजपाचे सरकार स्थापन झाले, असे म्हणत त्यांनी भाजपाच्या देवेंद्र फडणवीसांचे आभार मानले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.