गणेशोत्सवाच्या तोंडावर मुख्यमंत्र्यांनी कोणता दिला इशारा?

115

राज्याचा मुख्यमंत्री म्हणून सरकारला या संकटाशी सामना करण्यासाठी संपूर्ण तयारीत राहण्याच्या स्पष्ट सूचना आहेत. सत्ताधारी, विरोधी अशा सर्वच पक्षांना आवाहन करीत आहे की, आता अधिक काळजी घ्या. गर्दीचे कार्यक्रम टाळा, सण, उत्सव आले आहेत, त्यावर निर्बंध लावावेत असे कोणाला वाटेल? पण शेवटी आपले आरोग्य, प्राण महत्त्वाचे, उत्सव नंतरही साजरे करू, असे इशारा वजा आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

सभा, मोर्चे त्वरित बंद करा! 

कोरोनाच्या रुग्णसंख्येत दिवसेंदिवस चढ-उतार दिसून येत आहेत. या पार्श्वभूमीवर राजकीय पक्ष आणि संघटनांनी गर्दी होणारे कार्यक्रम, सभा, मोर्चे त्वरित स्थगित करावेत, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. तसेच इतर कार्यक्रम काटेकोरपणे नियमांत राहून साजरे करता येतील. त्यामुळे आता आपल्याला मुळात तिसरी लाट येऊच द्यायची नाही, जनतेच्या आरोग्याला प्रथम प्राधान्य द्या, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

तरच पुन्हा कडक निर्बंध लावण्याची वेळ येणार नाही!

‘हे उघडा ते उघडा’ या मागण्या ठीक आहेत, पण त्यातून धोका वाढला आहे. प्रत्येकाने नियम आणि मर्यादा पाळल्या तर पुन्हा कडक निर्बंध लावण्याची वेळ येणार नाही. म्हणूनच माझ्या शिवसेनेसह सर्वच राजकीय पक्षांना मी विनम्र आवाहन करीत आहे, आपण सगळ्यांनीच शहाणपणाने वागून लोकांच्या जीवाचे रक्षण करायला हवे. सण, उत्सव आज झाले नाहीत तर उद्या नक्की येतील, पण घरातला प्रत्येक माणूस आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. लोकांच्या जीवावर विघ्न टाळायचे असेल तर, शासनाने वेळोवेळी आखून दिलेल्या आरोग्याच्या नियमांचे पालन होईल हे काटेकोरपणे पहा, गर्दी करू नका. सार्वजनिक कार्यक्रम टाळा. राजकीय सभा, संमेलनांना उत्तेजन देऊ नका, हीच त्या विघ्नहर्त्या श्री गणेशाची इच्छा असेल, असेही मुख्यमंत्री म्हणाले. तसेच कोविड परत वाढतोय. येणारे दिवस आव्हानात्मक असतील आणि परिस्थिती हाताबाहेर जाऊ द्यायची नसेल तर विशेषतः सर्व राजकीय पक्षांवर त्याची प्रमुख जबाबदारी आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

सरकार सुविधा निर्माण करेल

दुसऱ्या लाटेची सुरुवात कशी झाली त्याची आपणास पूर्ण कल्पना आहे. या लाटेत ऑक्सिजनचा मोठा तुटवडा होऊन बिकट परिस्थिती निर्माण झाली होती. केवळ महाराष्ट्रच नव्हे तर देशाला देखील यातून जावे लागले होते. महाराष्ट्रासह संपूर्ण देश कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या उंबरठ्यावर आहे. नव्हे नव्हे, कोरोनाने जोरदार धडक द्यायला सुरुवात केली आहे. अमेरिकेत तिसऱ्या लाटे जीवन अत्यावस्त केले. चीनही विळख्यात सापडला. आपल्या देशातच केरळ राज्यात रोज ३० हजार नवे रुग्ण समोर येत आहेत. हा धोक्याचा इशारा आहे व तो आपण सगळ्यांनी गांभीर्याने घेतला नाही, तर महाराष्ट्राला जनजीवनाची फार मोठी किंमत चुकवावी लागेल. सरकार सुविधा निर्माण करील, पण त्याचा वापर करण्याची वेळ येऊ नये, यासाठी प्रयत्न करा असे आवाहन मुख्यमंत्री ठाकरे यांनी केले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.