मुख्यमंत्री म्हणतात, मला तुरुंगात टाका!

143

मी घाबरलोय म्हणून असे बोलत नाही. जे काही मतभेद असतील तर सांगा, पण बदनामी करू नका. सत्ता मिळवण्यासाठी कुटुंबावर तणाव आणू नका. मी तुमच्यासोबत येतो. टाका मला तुरुंगात…पण कुटुंबाची बदनामी करू नका, आम्ही कधीच केली नाही. तुमच्या सवडीने आरोप गोळा करा. पेनड्राइव्ह आणण्यापेक्षा मला तुरुंगात टाका, मी तयार आहे. तुरुंग कोणता तर कृष्ण जन्मभूमीचा तुरुंग असेल त्यात टाका. मी कृष्ण नाही तसे तुम्ही कंस नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत धक्कादायक भूमिका घेतली.

राज्यात अघोषित आणीबाणी

गेल्या काही दिवसांत राज्यात सुरू असलेल्या ईडी कारवाईविरोधात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संताप व्यक्त केला. प्रतिमा मलिन करणे आणि बदनामी करणे हे कुठल्या थराला जाऊन करणार आहात. हा धुतराष्ट्र नाही छत्रपतींचा महाराष्ट्र आहे. या वाटेला जावू नका. कुणाचेही भले होणार नाही, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला. २०१४ मध्ये युती तुम्ही तोडली. मी तेव्हाही हिंदु होता. तुरूंगात टाकणार असाल मला टाका, सगळ्यांची जबाबदारी मी घेतो. १९९३ मध्ये ज्या शिवसैनिकांनी मुंबई वाचवली, हिंदूंना वाचवले, तेव्हा अनिल परब यांना रस्त्यावर मारहाण झाली होती. त्यांचा बंगला तोडणार का? राज्यात अघोषित आणीबाणी लादली आहे, असेही मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.

(हेही वाचा ईडी आहे की घरगडी? मुख्यमंत्र्यांचा भाजपाला टोला)

शिखंडीप्रमाणे कशाला काम करता? 

हर्षवर्धन पाटील यांना झोप लागत नव्हती, मग त्यांनी झोप लागायचे औषध घेतले. भाजपाकडे असे कोणते झोपेचे औषध आहे. आम्ही दाऊदची माणसे, भ्रष्टाचारी असे म्हणतात. पहाटेचा शपथविधी यशस्वी झाला असता तर नवाब मलिक, अनिल देशमुख यांच्यासोबत मांडीला मांडी लावून बसला असता ना? केंद्रीय तपास यंत्रणांचा दुरुपयोग करून अंगावर काय येता? हा नामर्दपणा आहे. हिंमत असेल समोर या, घरच्यांवर कसले आरोप करता? महाभारतातील शिखंडी होता त्यासारखे कशाला काम करता? असा संतप्त सवाल उद्धव ठाकरेंनी भाजपाला विचारला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.