पावसाळी अधिवेशनही अध्यक्षाविना होणार?

अध्यक्षपदाची निवडणूक न घेता अध्यक्षांविनाच दोन दिवसांचे कामकाज संपवण्याचा इरादा मुख्यमंत्र्यांचा आहे.

132

राज्याचे पावसाळी अधिवेशन येत्या पाच जुलैपासून सुरू होणार असून, कोराना संकटामुळे हे अधिवेशन फक्त दोन दिवसांचे घेण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे. मात्र नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर अर्थसंकल्पीय अधिवेशन अध्यक्षाविनाच पार पडले होते. त्यामुळे पावसाळी अधिवेशनात तरी विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक पार पडणार का? असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. मात्र सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पावसाळी अधिवेशन देखील अध्यक्षांविनाच घ्यायचे, असा मानस राज्य सरकारचा आहे. पावसाळी अधिवेशनाचे दोन दिवसांचे काम हे देखील अध्यक्षाविनाच करुन घेण्याची तयारीच जणू ठाकरे सरकारने केल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे.

म्हणून नको अध्यक्षपदाची निवडणूक

राज्यात सध्या महाविकास आघाडी धोक्यात असल्याची चर्चा सुरू असून, हे सरकार पडेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यातच शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी टाकलेल्या लेटर बॉम्बमुळे आमदारांची नाराजी देखील समोर आली आहे. त्यामुळे जर विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेतली, तर त्याचा दगाफटका सरकारला बसण्याची दाट शक्यता आहे. याचमुळे पावसाळी अधिवेशन देखील विधानसभा अध्यक्षांविनाच करण्याचा सरकारचा मानस आहे. एवढेच नाही तर विधानसभा अध्यक्षपदावर राष्ट्रवादी काँग्रेसचा देखील डोळा असून, काँग्रेस अध्यक्षपदावरील दावा सोडायला तयार नाही. त्याचमुळे एकीकडे अशा पद्धतीचे वातावरण असताना, अध्यक्षपदाची निवडणूक न घेता अध्यक्षांविनाच दोन दिवसांचे कामकाज संपवण्याचा इरादा मुख्यमंत्र्यांचा आहे.

(हेही वाचाः मंत्री विभागाचे राजे, प्रत्येक विभागात एक-एक वाझे! फडणवीसांचा सरकारवर हल्ला)

नाना नेमकं काय म्हणाले?

विधानसभा अध्यक्षपद अनेक दिवसांपासून रिक्त असल्याबाबत नाना पटोले यांना विचारले असता, त्यांनी पुढच्या दोन आठवड्यांत अधिवेशन होणार असल्याचे जाहीर झाले आहे. त्याआधी विधानसभा अध्यक्ष जाहीर करावा, अशी काँग्रेसची मागणी असल्याचे सांगितले. कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन याच आठवड्यात तिन्ही पक्षांचे सर्व आमदार उपस्थित राहिले पाहिजेत, म्हणून आमचे प्रयत्न सुरू आहेत. या पदावर काँग्रेसचेच नाव आहे. परंतु ते आताच सांगता येणार नाही. ती खुर्ची काही सोपी नाही, अनेक जण त्याला नकार देत आहेत. ज्या दिवशी निवडणूक होईल तेव्हा नाव माहिती पडेलच, असेही नाना पटोले म्हणाले.

परबांनी बोलणे टाळले

दोन दिवसांपूर्वी याच विषयी संसदीय कामकाज मंत्री अनिल परब यांनाही याबाबत विचारण्यात आले होते. त्यावेळी ते म्हणाले की, कामकाज सल्लागार समितीची बैठक पार पडली. त्यामुळे कार्यक्रम पत्रिका येईल तेव्हा आपल्याला नेमका काय कार्यक्रम असेल हे समजेल, असे म्हणत त्यांनी जास्त बोलणे टाळले.

(हेही वाचाः काँग्रेसच्या नानांवर आता मुख्यमंत्रीही नाराज)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.