“आम्ही नको ती अंडी उबवली”, मुख्यमंत्र्यांचा भाजपला टोला

82

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज बारामती दौऱ्यावर आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत इन्कुबेशन सेंटरचं उद्घाटन करण्यात आलं. त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शरद पवार आणि पवार कुटुंबीयांच्या विकासविषयीच्या दृष्टीचं कौतुक करत विरोधकांवर चांगलाच निशाणा साधला. तसेच त्यांनी आपला माजी मित्रपक्ष असलेल्या भाजपाला देखील टोला लगावला.

राजकारणात एक इन्क्युबेशन सेंटर आवश्यक

याप्रसंगी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी २५ वर्ष मित्रपक्ष असलेल्या आणि सध्या विरोधक असलेल्या भाजपावर खोचक टीका केली आहे. ‘जिद्द हवी, बदल सगळीकडे घडू शकतो हे इथे दिसून आले आहे. मी मनातल्या मनात विचार करत होतो, राजकारणात देखील एक इन्क्युबेशन सेंटर आवश्यक असतं. आम्हीही उघडलं होतं २५-३० वर्ष. इन्क्युबेशनला मराठीत उबवणी केंद्र म्हणतात. आम्हीही नको ती अंडी उबवली. त्याचं पुढे काय झालं ते तुम्ही बघत आहात. अशा गोष्टी घडत असतात. आपले काम आपण केले. पुढे काय करायचे हे त्यांनी ठरवायचं असतं’

(हेही वाचा-अजित पवारांच्या अडचणी वाढल्या! कोणी केली कारवाई?)

‘पवारांनी विकासाचा सूर्य दाखवला’

उद्धव ठाकरे यांनी इन्क्युबेशन सेंटरचे उद्घाटन करताना शरद पवार आणि अजित पवार यांच्यासोबत पवार कुटुंबाचे कौतुक केले. पवार कुटुंबानं राज्यासाठी केलेले काम खूप मोठं आहे. शरद पवारांनी विकासाचा सूर्य दाखवला. ते अजूनही थांबायला तयार नाहीत. त्यांचे काम अविरत सुरू आहे. मी दुसऱ्यांदा बारामतीला आलो आहे. पहिल्यांदा आलो तेव्हा शेतीचे प्रदर्शन पाहिले. आज देशातले सर्वात मोठं इन्क्युबेशन सेंटर पाहतोय. संपूर्ण पवार कुटुंब विकासाच्या ध्यासानं काम करत आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी पवार परिवाराचं कौतुक केलं आहे.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.