मुख्यमंत्री तळीये गावाकडे रवाना! महाडच्या पुराचाही आढावा घेणार!

तळीये गावात दरड कोसळून ४० जणांचा मृत्यू झाला आहे.

112

मागील ४ दिवसांच्या पावसांत सर्वाधिक नुकसान झालेल्या महाडला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शनिवारी, २४ जुलै रोजी दुपारी मुंबईहून हेलिकॉप्टरने महाडकडे रवाना झाले आहेत. या ठिकाणी तळीये गावात दरड कोसळून ४० जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे या भागही पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री ठाकरे हे महाड येथील एमआयडीसी हेलिपॅड येथे पोहोचून तेथून ते वाहनाने तळीये गावासाठी रवाना होतील. दुपारी १.३० वाजता तळीये येथे पोहचून ते दुर्घटनाग्रस्त गावाची पाहणी करणार आहेत. त्यानंतर दुपारी ३.२० वाजता ते परत महाड होऊन मुंबईकडे हेलिकॉप्टरने रवाना होणार आहेत. मुखमंत्री ठाकरे यांच्यासोबत मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार आहेत. घटनास्थळी पालकमंत्री अनिल परब हेही उपस्थितीत असणार आहेत.

पूरग्रस्तांना मोफत अन्नधान्य वाटप!

महाराष्ट्रात विविध भागात अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले आहे. महापुरामुळे विशेषत: महाराष्ट्रातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली आणि कोल्हापूर या सहा जिल्ह्यांना मोठा फटका बसला आहे. यात सर्वसामान्य जनतेचे मोठे नुकसान झाले आहे. या भागातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी घरे, शेती आणि रस्ते वाहून गेले आहेत. अनेक ठिकाणी घरे अजूनही पाण्याखाली आहेत. अशा पूरग्रस्तांना मदत म्हणून राज्य शासनाकडून मोफत अन्न-धान्य आणि केरोसीनचे वाटप केले जाणार असल्याबाबत नाशिक येथे पत्रकार परिषदेत बोलताना राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ म्हणाले.

(हेही वाचा : पश्चिम महाराष्ट्र अजूनही पाण्याखाली! दूध पुरवठ्यावर परिणाम!)

पूरग्रस्त भागातील बचाव कार्याचा अहवाल

मदत व पुनर्वसन विभागाने शनिवारी, २४ जुलै रोजी सकाळी दिलेल्या माहितीनुसार पूरग्रस्त भागातून सुमारे ९० हजार नागरिकांना सुखरूपपणे बाहेर काढले आहे. एकूण ७६ जणांचा मृत्यू झाला असून ७५ जनावरांचे मृत्यू झाले आहेत. एकंदर ३८ लोक जखमी असून ३० जण बेपत्ता आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.