
- स्वप्नील सावरकर
‘मी पुन्हा येईन’चा अध्याय एका ब्रेकनंतर ‘मी पुन्हा आलो’मध्ये रुपांतरीत झालाय. ५ डिसेंबर २०२४ पासून ‘पुन्हा’, ‘केंद्रात नरेंद्र’ आणि ‘राज्यात देवेंद्र’ असे चित्र निर्माण झालंय. देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी तिसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आणि समस्त फुरोगामी, जातीवादी, अराजकतावादी कंपूंना ४२० व्होल्टचा धक्का मतदारांनीच दिलाय.ज्या विरोधकांनी संविधान धोक्यातचं खोटं नरेटिव्ह सेट करत लोकसभेत हिंदुत्ववादी पक्षांना थोडं मागं सारलं होतं, त्या काँग्रेसी महाआघाडीला मतदारांनी विधानसभा निवडणुकीत त्यांची खरी जागा दाखवली. आणि, हिंदुत्वाचा नारा देणाऱ्या देवेंद्र फडणवीसांच्या महायुतीला स्वप्नवत बहुमत देत सत्तेवर आणत लोकसभेतील फसवणुकीतून झालेली घोडचूक मतदारांनी सुधारली. खरंतर, त्यामुळेच प्रचारात ‘देवाभाऊ’ म्हणून गाजलेल्या देवेंद्रजींवरची जबाबदारी अधिक वाढली.
लोकांनी आता हिंदुत्वाचा चेहरा म्हणून देवाभाऊंकडे पाहण्यास सुरुवात केली आहे. २०१४ मध्ये तुम्हाला भाजपाने मुख्यमंत्रीपद देऊन तुमच्या क्षमतेला वाव दिला होता. २०१९ मध्ये हिंदुहृदयसम्राट बाळासाहेबांचे चिरंजीव उद्धव ठाकरे यांनी मतदारांनी महायुतीला दिलेल्या कौलाशी गद्दारी करत, हिंदुत्वाला दूर सारत मुख्यमंत्रीपद बळकावले होते आणि फडणवीसांना जनतेने दिलेल्या मुख्यमंत्रीपदापासून दूर ठेवले होते. २५ वर्षे सत्तेत राहण्याचा दावा करणाऱ्यांना २५ महिन्यांनंतरच एकनाथ शिंदेंसारख्या बाळासाहेबांच्या हिंदुत्ववादी शिवसैनिकाने ४० आमदारांना बरोबर घेऊन धडा शिकवला आणि सत्तेतून बेदखल केले. अर्थात, त्यावेळी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) राजकीय तडजोडीतून उपमुख्यमंत्री झाले. त्यानंतरचा अडीच वर्षांचा काळ तसा कसोटीचाच राहिला. लोकसभेत भाजपाला अपेक्षित यश मिळाले नाही. त्याची संपूर्ण जबाबदारी घेत फडणवीसांनी राजीनामा देण्याची घोषणाही केली. परंतु, पक्षाने विश्वास दाखवत नव्या लढ्याची स्फूर्ती दिली आणि त्यांनी विधानसभेत जनतेच्या आशा पुनरुज्जीवित करत महाकाय असा विजय संपादित केला. त्याचे फळ म्हणूनच आता त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या आड येण्याचा कोणी किती प्रयत्न केला तरी ते शक्य झाले नाही.
परंतु, देवाभाऊ (Devendra Fadnavis) आता खरा धोका पुढे आहे, हे तुम्ही जाणून असालच. तरी, तुम्हाला सावध करण्याची जबाबदारी तमाम हिंदुत्ववादी मतदारांच्या वतीने आमची आहे, असे समजतो. आजवर तुमच्यावर विरोधकांनी अत्यंत हीन पातळीचे आरोप केले. तुमच्या पत्नीवरून, शरीरावरून नको नको त्या टीका झाल्या. जातीवरून तर तुम्ही कायमच लक्ष्य राहिलात. तरी तुम्ही कधीच डगमगला नाही आणि तुमची पातळी कधी सुटली नाही, हेच तुमचे उच्च संस्कार आहेत. त्या सर्वांना आता तुमच्यावतीने लोकांनीच बहुमतरुपी उत्तर दिलंय.
(हेही वाचा “…मग तिथेही ईव्हीएम घोटाळा झाला का?” Eknath Shinde यांचा शरद पवारांना सवाल)
खरे शकुनी ओळखा!
महाराष्ट्रात कपटी राजकारणाचा मेरूमणी असलेल्या शरदराव पवारांना आजवर न भेटलेला खेळाडू तुमच्या रुपाने भेटला. तुम्ही त्यांचं साडेतीन जिल्ह्याचं राजकारण आता पार बारामती लोकसभा मतदारसंघापुरतं मर्यादित केलंय. जेमतेम १० आमदारांवर आलेली शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस पुरती गळपटली असं जरी वाटलं तरी काळजी घ्याच. कारगिल युद्धावर आधारीत ‘लक्ष्य’ या चित्रपटात सैन्यातल्या आचाऱ्याची भूमिका वठवताना ओम पुरीचा एक संवाद आहे. तो हृतिक रोशनला सांगतो, पाकडे घाबरून पळून गेले तरी नंतर पुन्हा वळून येतात आणि भ्याड हल्ला करतात, हे लक्षात ठेव. त्याप्रमाणे, हृतिक रोशन काळजी घेतो आणि फिरून आलेल्या पाकड्यांना गोळ्या घालत शिखर पादाक्रांत करतो, असे चित्रपटात दाखवले आहे. हा संवाद तुम्हीही लक्षात ठेवा, तुमच्या अवतीभोवती ‘पाकडे’ नाहीत पण ‘पवार’ आहेत याचे भान ठेवा.
जातीयवादाचे टूलकिट
खरंतर तुम्ही मराठ्यांना न्यायालयात टिकलेलं आरक्षण दिलं होतं. राजकीय स्वार्थात माखलेल्या विरोधी नेत्यांच्या खोट्या नरेटिव्हला फसलेल्या भोळ्या मराठा समाजाच्या गैरसमजापोटी तो प्रश्न आजही चिघळत पडलाय. आता पुन्हा जरांगेसदृश्य प्रवृत्ती जुन्याच गॉडफादरांच्या आशीर्वादाने उचल घेतील. आमरण (कधीही न मरणारे) उपोषणं, आंदोलनांसह तुम्हाला टार्गेट करण्याचं ‘टूलकिट’ सक्रीय होईल. मराठाबरोबरच ओबीसी, धनगर, आदिवासी आदी समाजातही धुसफूस वाढवण्याचे उद्योग होतील. त्याची योग्य ती काळजी तुम्ही घ्यालच. त्यासाठी तुमच्यासोबत असलेल्या दोन मराठा उपमुख्यमंत्र्यांचीही मदत होईलच. तरी, हा मुद्दा तुमच्यासाठी गले की हड्डी बनणार नाही, एवढं बघा!
विकासविरोधकांचे आव्हान
महायुतीच्या नव्या प्रकल्पांना विविध कारणांपोटी विरोधाचे राजकारण वाढेलच. त्यात, वाढवण बंदर, बुलेट ट्रेन, ऊर्जा प्रकल्प, रस्ते-उड्डाण पूल आदी सर्व प्रकल्प रडारवर आहेत आणि राहतीलच. तुमच्या पहिल्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात उत्तर महाराष्ट्रातून मुंबईकडे निघालेला लाल झेंड्याच्या नेतृत्त्वाखालचा शेतकरी मोर्चा आठवत असेलच. शेतकऱ्यांच्या नावाखाली तसे प्रयत्न पुन्हा होतील, हे काही वेगळे सांगायला नको. आता तर हरलेल्या सहकारसम्राटांनी दुधाचे भाव पाडून त्याची पेरणीही सुरू केली आहे, हे लक्षात घ्या. शेतमालाच्या भावावरूनही पुन्हा आंदोलनं सुरू झाली तर नवल नाही. पण खऱ्या शेतकऱ्यांना लाभ मिळतील, विमा मिळेल, याची जबाबदारी शासनाचीच आहे आणि तुम्ही शासकीय झारीतील शुक्राचार्यांचाही बंदोबस्त कराल आणि पुढे वाट काढाल, अशी खात्री आहे. मात्र, या सर्वांतून तुम्ही जाहीरनाम्यातून दिलेली आश्वासने पूर्ण करणे अजिबात विसरू नका. अन्यथा, लाडक्या बहिणींची ओवाळणी भारी पडू शकते आणि इतर योजना बंद न होता उर्वरित काळासाठी सुखनैव सुरू राहतील, याची काळजी घ्या. राज्यावरील कर्जाचे दाखले देत दिवाळं काढलं वगैरे आरोप तर होतीलच. परंतु, कर्ज असणं हे वाढत्या क्षमतेचंच लक्षण असतं असं अर्थशास्त्रच सांगतं हे जनतेला पटवून द्यावं लागेल. अर्थात, या सर्व योजना फलदायी ठरवण्यासाठी निधी लागणार आणि तो परदेशी तसेच इतर गुंतवणुकींच्या माध्यमातून आणणे तुम्हाला अशक्य नाही. (Devendra Fadnavis)
(हेही वाचा शरद पवारांच्या टीकेला मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांचं प्रतिउत्तर, ‘किमान आपण तरी जनतेची दिशाभूल करू नका’)
हिंदुत्ववाद विसरू नका!
यंदाची निवडणूक केवळ लाडक्या बहिणीने निवडून दिलेली नाही. तर, समस्त हिंदुत्ववादी मतदारांनी निवडून दिली आहे, हे कधीही विसरू नका. काळजीवाहू सरकारच्या काळात वक्फ बोर्डाला निधी देण्याचा शासन आदेश काढणाऱ्यांच्या संगतीत तुम्ही आहात, हेही लक्षात ठेवा. यांच्यासारख्या घरभेद्यांना वेळीच शोधून, ठेचून तुम्हाला हिंदुत्ववादी मतदारांच्या मनातले निर्णय घ्यायचे आहेत. कितीही विरोध झाला, कान भरण्याचा प्रयत्न झाला तरी तुम्ही योग्य रस्ता सोडणार नाही, अशी आमची अपेक्षा आहे. हिंदुत्ववादी म्हटला की जातीयवादी, हे नरेटिव्ह पहिल्यांदा खोडून काढून यापुढे हिंदुत्ववाद हाच खरा राष्ट्रवाद असल्याचे ठासून सांगायला लागा. त्यासाठी अनेक संघटना, संस्था आपापल्या परीने कार्य करत आहेत. त्यांच्या पाठीवर थाप द्या. अनेकदा आर्थिक मदत शक्य नसली तरी केवळ सहकार्याची भूमिका घेतली पुरेसे होते. या संस्था, संघटना राष्ट्रवादाचा प्रसार, प्रचार अधिक प्रखरतेने करत असतात, त्यांचा वापर चांगल्या कार्यांसाठी निश्चितपणे करून घ्या! (Devendra Fadnavis)
भाटांना सांभाळा!
राज्यशकट हाकताना राजाच्या दरबारात सर्व प्रकारची मंडळी गरजेची असतात. त्यात स्तुतीपाठकांपासून विदूषकांपर्यंत सर्वांचा समावेश होतो. राजेशाही संपून लोकशाही आली असली तरी हे प्रकार वेगळ्या स्वरुपात कायम आहेतच. त्यामुळे, खरे हितचिंतक कोण, हे तुम्ही ओळखालच. तरी, २०१४ च्या अनुभवांतून तुम्ही धडा घेऊन २०२४ च्या टप्प्याची सुरुवात धडाकेबाजपणे कराल, हेच अभिप्रेत आहे!
Join Our WhatsApp Community