हार्दिक पटेलचा काँग्रेसला ‘टाटा-बाय बाय’

114

गेल्या काही महिन्यांपासून काँग्रेस पक्षात अंतर्गत धुसफूस सुरू आहे. त्याचेच परिणाम आता समोर येताना दिसत आहेत. गुजरात काँग्रेसचे युवा नेते हार्दिक पटेल यांच्याकडून सातत्याने आपल्या पक्षावर टीका करण्यात येत होती. त्यामुळे ते पक्षाला सोडचिठ्ठी देणार अशी चर्चा होत असतानाच अखेर त्यांनी काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. आपले राजीनामा पत्र ट्वीट करत पटेल यांनी काँग्रेसला हात उंचावून टाटा-बाय बाय केले आहे.

काँग्रेसकडे कुठल्या अपेक्षेने पाहणार?

जेव्हा जेव्हा देश संकटात होता तेव्हा काँग्रेसचे नेते हे परदेशात जात होते. आमच्या सारखे कार्यकर्ते स्वखर्चाने दिवसाला 500 ते 600 किमी. प्रवास करुन, जनतेच्या समस्या जाणून घेण्यासाठी जात होतो. पण त्यावेळी गुजरात काँग्रेसचे मोठे नेते केवळ दिल्लीतून आलेल्या नेत्यांना वेळेवर चिकन, सँडविच मिळाले का यावर लक्ष ठेवत होते. त्यामुळे आता जनता काँग्रेसकडे कुठल्या अपेक्षेने पाहणार?, असा प्रश्न हार्दिक पटेल यांनी या पत्रातून केला आहे.

जे गुजरातच्या जनेताचा सन्मान करत नाहीत, अशा पक्षात तुम्ही का आहात?, असा प्रश्न मला कार्यकर्त्यांकडून वारंवार विचारण्यात येत होता. त्यामुळे आपण हा निर्णय घेतला आहे. काँग्रेस पक्षाने युवकांचा विश्वास तोडला आहे. त्यामुळे कुठलाही युवक काँग्रेससोबत राहू इच्छित नसल्याचे हार्दिक पटेल यांनी म्हटले आहे.

काँग्रेसचे विरोधाचे राजकारण

पटेल यांनी केलेल्या राजीनामा पत्रात अनेक खुलासे करत काँग्रेसबाबत नाराजी व्यक्त केली आहे. देशातील सर्व युवकांना एक सक्षम नेतृत्व आहे. पण असे असताना गेल्या 3 वर्षांपासून काँग्रेस केवळ विरोधाचे राजकारण करताना मला दिसत आहे. देश तसेच राज्य पातळीवर काँग्रेसची भूमिका केवळ केंद्र सरकारला विरोध करण्यापर्यंत मर्यादित राहिली आहे. पण देशातील जनतेला विरोध नाही तर त्यांच्या भविष्याबाबत विचार करणारा पर्याय हवा आहे, असे सांगत त्यांनी काँग्रेस पक्ष आणि पक्ष नेतृत्वाबाबत नाराजी व्यक्त केली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.