तुम्ही काहीही म्हणा… पण आम्ही तुम्हाला चंपा, टरबुज्या म्हणणार नाही! पटोलेंचे दादांना प्रत्त्युत्तर

चंद्रकांत पाटलांसारखे बोलघेवडे नेते महाविकास आघाडीतील नेत्यांवर टीका करुन मोदी सरकारचे अपयश झाकण्याचा प्रयत्न करत आहेत.

75

राज्यातील सत्ता गेल्यापासून भाजपचे नेते सैरभैर झाले आहेत. केंद्राच्या मदतीने राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार अस्थिर करण्याचे सगळे प्रयत्न विफल झाल्याने, आता त्यांचा तोल ढासळला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आम्हाला काहीही म्हटले तरी आम्ही भाजप नेत्यांना चंपा किंवा टरबुज्या म्हणणार नाही, ती आमची संस्कृती नाही. चंद्रकांत पाटलांना तेलकट थापा मारुन केंद्राचे अपयश आणि मराठा, ओबीसी समाजाच्या फसवणुकीचे पाप झाकता येणार नाही, असे प्रत्युत्तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी चंद्रकांत पाटलांना दिले आहे.

(हेही वाचाः देवेंद्र भाऊंची दिल्लीत चलती)

मोदी सरकार अपयशी

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरले आहे. इंधनाचे दर गगनाला भिडले आहेत. महागाई प्रचंड प्रमाणात वाढली आहे. गेल्या आठ महिन्यांपासून केंद्र सरकारने आणलेल्या तीन काळ्या कायद्यांविरोधात देशाच्या राजधानीच्या वेशीवर हजारो शेतकरी आंदोलन करत आहेत. कोरोना महामारी आटोक्यात आणण्यासाठी मोदी सरकारकडे काही ठोस धोरण नाही. लसीकरण मोहिमेचा बोजवारा उडालेला आहे. गंगेच्या पात्रातून वाहणारे मृतदेह जगभरातील माध्यमांनी दाखवल्यामुळे मोदी सरकारच्या अब्रुची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत. मोदी सरकारने केंद्रीय आरोग्यमंत्री आणि पेट्रोलियम मंत्री बदलून आपल्या अपयशाची कबुलीच दिली आहे. पण चंद्रकांत पाटलांसारखे बोलघेवडे नेते महाविकास आघाडीतील नेत्यांवर टीका करुन मोदी सरकारचे अपयश झाकण्याचा प्रयत्न करत आहेत, असा टोला नानांनी लगावला.

(हेही वाचाः कोण होणार विधानसभा अध्यक्ष? पवारांनी केले स्पष्ट…)

तर चंद्रकांत दादांच्या टीकेचे स्वागतच

चंद्रकांत पाटलांनी आमच्यावर कितीही खालच्या पातळीवर जाऊन टीका करावी. त्यांनी आम्हाला कितीही हिणवले तरी आमची हरकत नाही. त्यांनी आमच्यावर केलेल्या टीकेमुळे पेट्रोल, डिझेल व जीवनाश्यक वस्तूंचे दर कमी होणार असतील, देशातील सर्व नागरिकांना मोफत कोरोना प्रतिबंधात्मक लस मिळणार असेल, मोदी सरकारने आणलेले तीन शेतकरी विरोधी काळे कायदे रद्द होणार असतील, केंद्र सरकारने जाणीवपूर्वक न्यायालयाच्या माध्यमातून रद्द केलेले मराठा आणि ओबीसी आरक्षण मिळणार असेल, तर चंद्रकांत पाटलांच्या टीकेचे स्वागतच आहे, असेही नाना म्हणाले.

(हेही वाचाः गाढवांचा भार उचलायला, बैलांचा नकार! प्रसाद लाडांची काँग्रेस आंदोलनावर टीका)

पोपटपंची नको आरक्षण द्या

नितीन गडकरी यांच्या कारखान्याची चौकशी करण्याची मागणी अमित शाह यांच्याकडे करुन, चंद्रकांत पाटील गडकरींचे तोंड बंद करण्याचा प्रयत्न करत असतील. पण आमचा आवाज ते बंद करू शकणार नाहीत. आम्ही देशातील गरीब, कष्टकरी जनता व शेतक-यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवत राहू. ईडी सीबीआयचा वापर करुन मोदी-शाह आमचा आवाज बंद करू शकले नाहीत. त्यामुळे चंद्रकांत पाटलांनी पोपटपंची करण्यापेक्षा केंद्राने जाणीवपूर्णक अडवून ठेवलेले मराठा आणि ओबीसी आरक्षण मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले.

(हेही वाचाः सगळ्यांना मान्य आहे तर मग अडतंय कुठे? आरक्षणावरुन राज ठाकरेंचा सवाल)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.