शिवसेनेनंतर आता काँग्रेसमध्येही अंतर्गत कलह! ‘त्या’ सात आमदारांवर कारवाई करण्याची मागणी

94

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर शिवसेनेतील अंतर्गत कलह सगळ्या जगासमोर आला. पण आता महाविकास आघाडीतील शिवसेनेसोबत असलेल्या काँग्रेसमध्येही अंतर्गत धुसफूस असल्याचे समोर येऊ लागले आहे. विधान परिषदेत काँग्रेसची जी सात मतं फुटली त्या सातही आमदारांवर कारवाई करण्याची मागणी आता पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.

पृथ्वीराज चव्हाण यांची मागणी

विधान परिषदेत काँग्रेसचे पहिल्या पसंतीचे उमेदवार चंद्रकांत हांडोरे यांचा पराभव झाला. त्यामुळे या निवडणुकीत काँग्रेस आमदारांची मतं फुटल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे याची गंभीर दखल घेत माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी काँग्रेस प्रभारी एच.के.पाटील यांच्याकडे ज्या सात आमदारांची मतं फुटली त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

(हेही वाचाः ‘त्यांनी पाच वर्ष टीव्हीसमोर येऊ नये’, शहाजीबापूंचा राऊतांना झणझणीत टोला)

विधानसभा अध्यक्ष निवडणुकीवेळीही आमदार गैरहजर

काँग्रेसमधील हा अंतर्गत विरोध हा पक्षाच्या हिताचा नसून ते सात आमदार कोण आहेत याचा शोध घ्यायला हवा. तसेच विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीवेळीही काँग्रेसचे काही आमदार गैरहजर असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे ही अतिशय गंभीर बाब असून त्याची दखल घेणं गरजेचं असल्याचं पृथ्वीराज चव्हाण यांनी एच.के.पाटील यांना दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे. त्यामुळे आता शिवसेनेतील मोठ्या बंडानंतर काँग्रेसमध्ये घडत असलेल्या या अंतर्गत घटनांकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

(हेही वाचाः ‘काय झाडी, काय डोंगार…’, कसा झाला डायलॉगचा जन्म? खुद्द शहाजीबापूंनी सांगितला किस्सा)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.