NDAशी लढायला नवे जयप्रकाश आणणार कुठून?

125
  • विनायक ढेरे

काँग्रेसचा ‘राहुल लाँचिंग प्रयोग’ फसल्यानंतर सोनिया गांधी यांनी स्वतः पुढाकार घेऊन उभ्या केलेल्या नव्या विरोधी ऐक्याच्या I.N.D.I.A. आघाडीचे १९७७चे स्वप्न वगैरे ठीक आहे, पण त्याचवेळी मोदींनी पुनरुज्जीवीत केलेल्या NDA शी लढायला ‘नवे जयप्रकाश नारायण’ कुठून आणणार?, असा सवाल तयार झाला आहे.

I.N.D.I.A. अर्थात (इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इन्क्लूसिंग अलायन्स) आणि NDA (नॅशनल डेमोक्रॅटिक अलायन्स) अर्थात राष्ट्रीय लोकशाही आघाडी या दोन नव्या बॅटल लाईन्स तयार झाल्या. त्यातली I.N.D.I.A. बॅटल लाईन ही नव्या स्वप्नांसह २०२४ची निवडणूक लढवणार आहे आणि त्यामध्ये सामील झालेले सर्व विरोधी पक्ष १९७७ चा फॉर्म्युला समोर आणून आपली स्ट्रॅटेजी ठरवत आहेत. त्या स्ट्रॅटेजीनुसार त्यांना मोदींच्या एकाधिकारशाहीला हरवायचे आहे. यातला १९७७ चा फॉर्म्युला, त्यानुसारची स्ट्रॅटेजी हे शब्द वगैरे सगळे ठीक आहेत, I.N.D.I.A. आघाडीच्या नेत्यांनी तसे स्वप्नही बघायला हरकत नाही. कारण नुसते स्वप्न बघायला पैसे पडत नाहीत. पण त्यापलीकडे जाऊन खरंच १९७७ चा विरोधकांचा फॉर्म्युला आता मोदींविरोधात उपयोगी येईल का? हा मूलभूत प्रश्न आहे आणि त्यासाठी १९७७ ची सर्व राजकीय पार्श्वभूमी लक्षात घेणे आवश्यक आहे.

काय होती १९७७ची राजकीय पार्श्वभूमी?

१९७७ मध्ये १८ जानेवारी या दिवशी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी अचानक आणीबाणी उठवली आणि लोकसभेच्या निवडणुका घेण्याचे जाहीर केले. त्या दिवसापर्यंत सर्व विरोधक तुरुंगात कोंडले होते. त्या सर्व विरोधकांची मानसिक स्थिती आता पूर्ण खच्ची झाली असेल, असा इंदिरा गांधींचा अंदाज होता आणि त्या अंदाजाला रिसर्च अँड ॲनालिसिस अर्थात त्यांनीच तयार केलेल्या ‘रॉ’ या गुप्तहेर यंत्रणेच्या रिपोर्टचा आधार होता. इंदिरा गांधींनी ‘रॉ’ रिपोर्टवर विसंबून राहून १८ जानेवारी १९७७ रोजी अचानक आणीबाणी उठवली. मोरारजी देसाई अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, चरण सिंग आदी नेत्यांची सुटका केली आणि त्यांना ‘अचानक’ निवडणुकीच्या रणमैदानात आणून सोडले. हे सर्व विरोधक तेव्हा खरंच विस्कळीत होते. यातला प्रत्येक नेता राष्ट्रीय पातळीवरचा होता हे खरे, पण त्यांना इंदिरा गांधींएवढा जनतेचा पाठिंबा नव्हता. पण १९७७मध्ये जो चमत्कार झाला, इंदिरा गांधींची बलाढ्य सत्ता म्हणता म्हणता जनतेने धुळीस मिळवली, त्याला कारणीभूत ठरले होते, जयप्रकाश नारायण यांचे प्रभावी आणि निष्कलंक नेतृत्व!

खरंतर जयप्रकाशजींच्याच नेतृत्वाखाली सुरू झालेले नवनिर्माण आंदोलन चिरडण्यासाठीच इंदिरा गांधींनी आणीबाणी लादली होती. पण ती आणीबाणी लादूनही जयप्रकाशजींच्या नेतृत्वाचे स्फुल्लिंग त्यांना विझवता आले नव्हते. १९७७च्या निवडणूक निकालानंतर हे ठळकपणे स्पष्ट झाले.

(हेही वाचा Asaduddin Owaisi : ना राहुल गांधी, ना ममता बॅनर्जी, ना अखिलेश यादव मुसलमानांचे सहानुभूतीदार; काय म्हणाले ओवैसी?)

निकाल लागेपर्यंत इंदिरा गांधी आपणच निवडून येणार जिंकून येणार या भ्रमात राहिल्या होत्या. पण जयप्रकाशजींच्या नेतृत्वाची नैतिक धार एवढी प्रखर होती, की अवघ्या काही महिन्यांत विस्कळीत झालेल्या विरोधकांना ते एकत्र करू शकले आणि आजच्या भाषेत ज्याला ‘मोट बांधणे’ म्हणतात, तशी विरोधकांची मोट जयप्रकाश नारायण यांनी बांधली. पण ते स्वतः निवडणुकीच्या राजकारणापासून कटाक्षाने अलिप्त राहिले. त्यांनी लोकसभेची निवडणूक लढवली नाही, की कोणत्याही पदाची अभिलाषा धरली नाही. त्यांना फक्त इंदिरा गांधींची जुलमी राजवट हटवायची होती आणि त्यांनीच निर्माण केलेल्या जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली सरकार आणायचे होते. जयप्रकाशजींचा अजेंडा स्पष्ट आणि नि:संदिग्ध होता. यात कुठेही स्वतःला सत्तेचा मोह नव्हता. पदाची अभिलाषा नव्हती.

१९७७ – २०२४ निवडणुकांमध्ये भेद

१९७७ आणि २०२४ या दोन वर्षांमध्ये झालेल्या आणि होणाऱ्या लोकसभा निवडणुकीतला हा मूलभूत महत्त्वाचा फरक आहे. २०२४ च्या निवडणुकीत सर्व विरोधकांनी एकत्र येऊन I.N.D.I.A. ही आघाडी जरूर स्थापन केली आहे. पण ती आघाडी स्थापन करताना त्यांनी आपल्यावरच भ्रष्टाचाराचे ओझे होऊन बदनाम झालेल्या UPA अर्थात (युनायटेड प्रोग्रेसिव्ह अलायन्स) नावाच्या आघाडीचा त्याग करून टाकला आहे. बंगलोर मध्ये जमलेल्या २६ पक्षांनी UPA नाव टाकून देऊन I.N.D.I.A. हे नवीन नाव आघाडीसाठी स्वीकारले आहे.
I.N.D.I.A. या आघाडीत एकही नेता जयप्रकाश नारायण यांच्या उंचीचा, कर्तृत्वाचा आणि नैतिक धाकाचा नाही. हा या आघाडीचा सगळ्यांत मोठा दोष आहे.

I.N.D.I.A आघाडीचे सर्व नेते अतिमहत्त्वाकांक्षी आहेत. ते निवडणुकीच्या राजकारणात प्रवीण आहेत. अनुभवी आहेत. देशभरातल्या विविध राज्यांमध्ये विशिष्ट प्रभाव निर्माण करणारे आहेत यात कोणतीही शंका नाही. पण यापैकी कोणीही नेता ‘जयप्रकाश नारायण’ नाही. जयप्रकाश नारायण यांच्याकडे असणारा सर्वात मोठा नैतिक आधार आणि नैतिक धाक INDIA आघाडीत असणाऱ्या एकाही नेत्याकडे औषधालाही नाही.

खटल्यांचा ससेमिरा

उलट यातल्या प्रत्येकावर शेकडो – हजारो कोटींच्या घोटाळ्यांचे खटले आहेत. यातल्या लालूंना चारा घोटाळ्यात शिक्षा झाली, तर सोनिया, राहुल नॅशनल हेरल्ड केसमध्ये जामिनावर आहेत. केजरीवाल, स्टालिनवर केव्हाही खटले दाखल होऊ शकतात कारण त्यांचे मंत्री ईडी कोठडीची हवा खात आहेत. त्यांनी तोंड उघडले की केजरीवाल – स्टालिन आत जातील. वरतून या सर्व नेत्यांवर मोदींनी घराणेशाहीचा शिक्का मारला आहे, तो वेगळाच!

सत्ता मोहातील प्रवाहपतीत

INDIA आघाडीतल्या किमान ४ – ५ नेत्यांना पंतप्रधानपदाची महत्त्वाकांक्षा आहे. यापैकी बहुतेक नेते कधी ना कधीतरी मोठमोठ्या पदांवर सत्तेवर राहिले आहेत. यातले ५ मुख्यमंत्री आहेत. सोनिया गांधी या तर पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या वरच्या पदावर राहिल्यात. म्हणजेच INDIA आघाडीतला कोणताही नेता सत्ता पदाच्या मोहापासून मुक्त नाही. उलट तो अधिक मोहात पडणारा आहे. सत्तेच्या मोहातला प्रवाहपतीत आहे. हे त्या नेत्यांच्या राजकीय इतिहास आणि वर्तमानावरून स्पष्ट होते.

अशावेळी सोनिया गांधींनी पुढाकार घेऊन भले I.N.D.I.A. आघाडीची मोट बांधली असेल, ती पुढे २०२४ पर्यंत टिकणारही असेल तरी देखील त्या आघाडीत ‘नैतिक जान’ भरण्यासाठी कोणते ‘नवे जयप्रकाश’ पुढे येऊ शकतील?, हा प्रश्न आहे. सोनिया गांधी ‘जयप्रकाश’ होतील? की शरद पवार ‘जयप्रकाश’ होऊ शकतील? ही I.N.D.I.A. आघाडीची गंभीर समस्या आहे.

ज्यांना नैतिक आधारच नाही किंवा ते बाहेरून कुठला नैतिक आधार निर्माण करून आपल्या आघाडीत घेऊ शकणार नाहीत, असे I.N.D.I.A. आघाडीतले नेते १९७७चे स्वप्न बघत आहेत, ही यातली सर्वांत मोठी राजकीय विसंगती आहे आणि म्हणूनच वर उल्लेख केलेला प्रश्न विचारला आहे, नवी I.N.D.I.A. आघाडी, १९७७ चे स्वप्न वगैरे सगळे ठीक आहे; पण मोदींच्या नव्या NDA विरुद्ध लढण्यासाठी ‘नवीन जयप्रकाश’ कुठून आणणार?, हा खरा प्रश्न आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.