ईडीने ताब्यात घेतल्यावर स्टंटबाजी करणाऱ्या वाचाळवीर राऊतांनी याआधी केलेली वादग्रस्त वक्तव्ये

89

सध्या राज्याच्या राजकारणात संजय राऊत पुन्हा चर्चेला आले आहेत. कारण आहे ईडीने राऊतांना ताब्यात घेणे. पत्रा चाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीने राऊतांची साडे नऊ तास चौकशी केल्यानंतर त्यांनी संजय राऊतांना ताब्यात घेतले. राऊत यांच्यामागे ईडीची पीडा मागे लागण्यामागे त्यांच्या वादग्रस्त वक्तव्याने राजकीय शत्रू वाढवल्याचेही कारण आहे, अशी चर्चा सुरू आहे. राऊतांनी त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे राजकीय शत्रू वाढवले, या वक्तव्यामुळे राऊत यांनी भाजप, राष्ट्रवादी, राजे घराणे, निवडणूक आयोग अशा सर्वांची नाराजी ओढवून घेतली.

एकनाथ शिंदे गटातील ४० आमदारांचा अपमान  

जून २०२२ मध्ये एकनाथ शिंदे शिवसेनेतील ४० आमदार घेऊन महाराष्ट्राबाहेर गेले, त्यावेळी शिवसेना नेते संजय राऊत यांनी या आमदारांविषयी अत्यंत हिणकस वक्तव्य केले. राऊत म्हणाले, ‘ज्याने बाळासाहेब ठाकरेंशी गद्दारी केली, तो संपला, बाळासाहेबांचे शाप लागले. एका बापाचे असाल तर ४० जणांनी राजीनामा द्या निवडणुकीला सामोर जा. गुलाब पाटलांची भाषणे पाहिली तर शिवसेनेत हाच एक असा दिसला. पण तुझ्या मायला आता ढुंगणाला पाय लावून पळाला. पुन्हा तुला पानटपरीवर बसवू. माझा शब्द कधी खोटा ठरणार नाही. आता गुवाहाटीमधून थेट 40 मृतदेह येतील, त्यांना थेट शवागरात पाठवण्यात येणार’, असे वक्तव्य केले. राऊतांच्या या अशा वक्तव्यांमुळे आमदारांचे बंड शांत होण्याऐवजी ते आणखी पेटले, अखेरीस शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे सरकार अल्पमतात आले आणि सरकार कोसळले.

राज्यसभा निवडणुकीवेळी केले वादग्रस्त विधान 

नुकतेच राज्यसभा निवडणूक महिनाभरापूर्वी झाली, त्यावेळी विधानभवनात आलेले संजय राऊत यांनी विधानभवन हे शिवसेना भवन आहे, असे वक्तव्य केले होते.

(हेही वाचा देशमुख, मलिक, संजय राऊतांंना अडचणीत आणणारा PMLA कायदा आहे तरी काय?)

कोरोनाच्या काळात डब्लूएचओच्या अधिकाऱ्यांवर टीका 

कोरोनाच्या काळात जागतिक आरोग्य संघटनेच्या अधिकाऱ्यांनी काही महत्वाच्या सूचना केल्या, त्यावेळी राऊत यांनी या अधिकाऱ्यांपेक्षा कंपाउंडर हुशार असतो, मी कंपाउंडरकडून औषधे घेतो, असे वक्तव्य केले होते. त्यानंतर राऊत यांचा कंपाउंडर म्हणून उल्लेख करत त्यांच्यावर टीका करण्यात येऊ लागली.

उदयनराजेंचा केला अपमान 

छत्रपती शिवाजी महाराजांचे साताऱ्या गाडीवरील वंशज उदयन राजे यांना ‘छत्रपतींचे वारस असल्याचा पुरावा द्यावा’, असे वक्तव्य संजय राऊतांनी केल्यानंतर राज्यभरात प्रतिक्रिया तीव्र उमटल्या होत्या. त्यावेळी उदयन राजे यांनी त्यांना कडक शब्दांत सुनावले होते.

(हेही वाचा sanjay raut ED Inquiry : मिटकरी कडाडले, पण अजित पवार नरमले)

निवडणूक आयोगालाच केलेले टार्गेट 

मुंबईमध्ये रामनवमीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना संजय राऊत यांचा तोल गेला. कायदे आमच्यासाठी बनवण्यात आले नाही. आम्ही हवे तेव्हा बदलू. सध्या निवडणुकीचे वातावरण आहे. आचारसंहिता चालू आहे. मात्र जे मनात आहे ते बाहेर नाही आले की श्वास कोंडल्यासारखा होतो, भाड मे गया कानून और भाड मे गयी आचारसंहिता’, असे राऊत यांनी म्हटले. राऊत यांच्या या विधानामुळे त्यांनी थेट निवडणूक आयोगालाच आव्हान दिल्याचं दिसून आले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.