नुसते स्वराज्य रक्षक नव्हे; ‘स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज’!

98

छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर नव्हे, केवळ स्वराज्य रक्षक होते, असे विधान करीत विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी वाद ओढवून घेतला होता. मात्र, पवारांवर तोंडसुख घेणाऱ्या शिंदे-फडणवीसांनीही पुरवणी मागण्यांच्या पुस्तिकेत संभाजी महाराजांचा उल्लेख स्वराज्य रक्षक असा कायम ठेवल्याने विधिमंडळात त्याची जोरदार चर्चा रंगली. त्याची दखल घेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवेदन सादर केले आणि ‘स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज’, असा बदल केला जाणार असल्याचे स्पष्ट केले.

( हेही वाचा : शुक्रवारी, 3 मार्चला मुंबईत होणाऱ्या गड-दुर्ग रक्षण महामोर्चाला मोठ्या संख्येने उपस्थित रहा; रणजित सावरकर यांचे आवाहन )

स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचे पुणे जिल्ह्यातील बलिदान स्थळ (मौजे तुळापूर ता. हवेली) आणि समाधी स्थळ स्मारक (वढू (बु.) शिरूर) येथील विकास आराखड्यास नियोजन विभागाने २८ जून २०२२ च्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे. या विकास आराखड्याच्या नावामध्ये अंशतः बदल करण्यात आला असल्याचे निवेदन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र विधान परिषद नियम ४६ अन्वये विधान परिषदेत केले.

या विकास आराखड्याच्या नावात अंशतः बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला असून सुधारित नाव ‘स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे बलिदान स्थळ मौजे तुळापूर, तालुका हवेली व समाधी स्थळ स्मारक वढू (बु.), शिरूर, जि.पुणे विकास आराखडा, असे निश्चित करण्यात आले आहे, असे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.