फडणवीस म्हणाले, पवारांना दिली चुकीची माहिती! देशमुख क्वारंटाईन नव्हते तर…

अर्थात त्या कार्यक्रमानुसार ते गेले असतीलच असा माझा दावा नाही, असे फडणवीस म्हणाले.

88

माजी आयुक्त परमबीर सिंग यांनी थेट राज्याच्या गृहमंत्र्यांवर गंभीर आरोप केले आणि एकच राजकीय वादळ आलं. ते वादळ शांत करण्यासाठी मग सगळे राजकीय नेते पळापळ करू लागले. मग त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सुद्धा हे वादळ शांत करण्यासाठी काल दिल्लीत पत्रकार परिषद घेतली आणि या प्रकरणात देशमुख यांचा काहीही संबंध नाही, हे सांगण्याचा प्रयत्न केला. पण आता त्याच बाबतीत देवेंद्र फडणवीस यांनी माहिती देत, शरद पवारांना चुकीची माहिती दिल्याचे म्हटले आहे.

ती माहिती चुकीची

भाजप आणि परमबीर सिंग यांच्याकडून झालेले आरोप राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी फेटाळून लावले होते. मात्र यावर देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार टीका केली असून, देवेंद्र फडणवीसांनी वेगवेगळी कागदपत्रे दाखवत शरद पवारांना योग्य ती माहिती दिली गेली नसल्याचा आरोप केला आहे. पवारांसारख्या राष्ट्रीय नेत्याच्या तोंडून चुकीची माहिती वधवून घेण्यात आली आहे. १५ तारखेला देशमुख आयसोलेट नव्हते. त्या दिवशी त्यांना अनेक लोक भेटले होते, असा दावाही त्यांनी केला. गृहमंत्री अनिल देशमुख १५ फेब्रुवारी रोजी होम क्वॉरंटाईन नव्हते. ते एका खाजगी विमानाने मुंबईत आले होते. त्या दिवशी ते अनेकांना भेटले होते, असा दावा करतानाच शरद पवार यांना चुकीची माहिती देण्यात आली असून, आता देशमुखांचे पितळ उघडे पडले आहे, असे देखील देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.

(हेही वाचाः देशमुख प्रकरणाची चौकशी करण्यासाठी, ठाकरे सरकार समिती नेमणार?)

गृहमंत्र्यांची कार्यक्रम पत्रिका

१५ तारखेची गृहमंत्र्यांची ही कार्यक्रम पत्रिका आहे. १५ तारखेला ते एका खाजगी विमानाने आले होते. १५ तारखेला ते आपल्या घरी होते. पण पोलिस विभागाच्या दैनंदिन कामाचा माझ्याकडे एक कागद आहे. त्यात १७ फेब्रुवारीची एक तारीख आहे. त्यात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबईला राहतील. तर अनिल देशमुख हे दुपारी ३ वाजता सह्याद्रीला येतील. त्यानंतर २४ तारखेला पुन्हा अनिल देशमुख हे ११ वाजता मोटारीने निवासस्थानी जाणार असल्याचं पोलिसांची माहिती आहे. अर्थात त्या कार्यक्रमानुसार ते गेले असतीलच असा माझा दावा नाही, असे फडणवीस म्हणाले.

देवेंद्र फडणवीस आज दिल्लीत

आपण मुख्यमंत्र्यांना पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांसंदर्भातील फोन टॅपिंग प्रकरणाचे सर्व पुरावे दिले होते. मात्र त्यानंतरही मुख्यमंत्र्यांनी काहीही कारवाई केलेली नाही, असे फडवीस यांनी म्हटले आहे. तसेच या फोन टॅपिंगप्रकरणी मी आज दिल्लीला जात असून केंद्रीय गृह सचिवांना सर्व माहिती देणार आहे व सीबीआय चौकशीची मागणी करणार आहे, असे फडणवीस यांनी पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट केले. २०१७ मध्ये मी मुख्यमंत्री व गृहमंत्री असताना मला माहिती मिळालेली की मुंबईतल्या हॉटेलमध्ये डिलींग होत आहे व मुंबई पोलिस अधिकारीही या डिलींगमध्ये सहभागी आहेत. मी लगेच कमिशनरना सांगून त्या सगळ्यांना अटक करण्यात आली. सर्व पुरावे असल्याने ही कारवाई करण्यात आली, असं फडणवीस यांनी सांगितले.

(हेही वाचाः अनिल देशमुख प्रकरणात ‘ही’ आहे शिवसेनेची भूमिका!)

काही मंत्री आणि अधिका-यांची नावे

या प्रकरणाचा संदर्भ देत पुढे फडणवीस यांनी, जे त्यावेळी उपलब्ध होतं ते आताही उपलब्ध आहे. मात्र आपलं सरकार वाचवण्यासाठी त्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप फडणवीस यांनी केला आहे. रश्मी शुक्ला राज्य गुप्तचर विभागाच्या प्रमुख होत्या. त्यांना बदल्यांच्या रॅकेटमध्ये मंत्र्यांची तसेच अधिकाऱ्यांची नावे समोर येत असल्याचे समजले. त्यांनी डीजी साहेबांकडे हे सगळे नंबर इंटरसेप्ट करायची परवानगी मागितली. जेव्हा कॉल रेकॉर्डिंग सुरू झालं तेव्हा अनेक बडे अधिकारी काही राजकारणी यांची नावं चर्चेत यायला लागली. हे सगळं लक्षात यायला लागल्यावर याचा संपूर्ण अहवाल रश्मी शुक्ला यांनी तयार केला व २५  ऑगस्ट २०२० रोजी डीजींना दिला. २६ तारखेला डीजींनी हा अहवाल सीताराम कुंटेंना फॉरवर्ड केला. २६ तारखेला हे मुख्यमंत्र्यांच्या लगेच लक्षात आणावं व सर्वसमावेशक चौकशी सीआयडीकरुन करावी. त्याचप्रमाणे या प्रकरणासंदर्भात गुप्तता पाळली जावी असं स्पष्ट पत्र डीजींनी लिहिले होते, असा दावा फडणवीस यांनी केला आहे.

फडणवीसांचा मोठा खुलासा

माझ्या माहितीनुसार त्याच्यानंतर संपूर्ण माहिती मुख्यमंत्र्यांना देण्यात आली होती. त्यांनी यासंदर्भात चिंताही व्यक्त केली. मात्र पुढे काही झालं नाही, असं फडणवीस म्हणाले. एवढी माहिती देण्यात आल्यानंतरही काहीच कारवाई होत नाही असे लक्षात आल्यानंतर, मुख्यमंत्र्यांकडून हा रिपोर्ट गृहमंत्र्यांना दिला गेला. त्यानंतर कारवाई झाली कोणावर तर कमिशनर इंटेलिजन्स रश्मी शुक्ला यांच्यावर. त्यांचे प्रमोशन थांबवले गेले. त्यांच्या हाताखाली काम करणा-यांना प्रमोशन देण्यात आले, असा दावा फडणवीस यांनी केला. त्यांचे रेकॉर्ड अत्यंत स्वच्छ होते. प्रमोशन द्यायला लागलं ते दिलं डीजी सिव्हिल डिफेन्स पदावर. जी पोस्टच अस्तित्वात नाही, असा आरोप फडणवीसांनी केला आहे. या अधिकाऱ्यांचं प्रमोशन थांबवण्यात येण्यामागे हे रिपोर्ट इंटरसेप्शन कारणीभूत ठरल्याचा दावा फडणवीसांना केला आहे. हे सर्व इटरसेप्शन चुकीचे ठरले असते कारण सगळे लोक उघडे पडले असते, असे फडणवीस यांनी म्हटले आहे. तसेच २५ ऑगस्ट २०२० पासून इतक्या महत्त्वाच्या रिपोर्टवर कारवाई का नाही झाली? असा सवाल फडणवीसांनी उपस्थित केला आहे. त्याचप्रमाणे या प्रकरणामध्ये ज्यांची नावं आली त्यांना तीच पोस्टिंग दिली गेली, असेही फडणवीस म्हणाले.

(हेही वाचाः फडणवीसांचे ‘ते’ भाकीत खरे ठरणार का? )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.