महाराष्ट्रात ‘काय ते द्या’चं राज्य”; फडणवीसांचा ठाकरे सरकारवर निशाणा

64

मुंबईत आज भाजप कार्यकारिणीची महत्वाची बैठक पार पडली. यावेळी भाजप नेत्यांनी महाविकास आघाडी सरकारवर चांगलाच हल्लाबोल केला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या बैठकीत अमरावती, नांदेड आणि मालेगाव मधील हिंसाचार, राज्यात सामुहिक बलात्काराच्या घटनांमध्ये होणारी वाढ, भर दिवसा होणाऱ्या हत्या, वसुली आणि भ्रष्टाचाराचे आरोप अशा सर्व बाजूने फडणवीसांनी ठाकरे सरकारला घेरले. महाराष्ट्राच्या इतिहासातले सर्वात भ्रष्ट सरकार म्हणून या सरकारची नोंद इतिहासामध्ये होणार आहे, अशा शब्दांत राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली आहे. इतकेच नाही तर सध्याचे ठाकरे सरकार म्हणजे कायद्याचे राज्य नसून काय ते द्या… फक्त घेण्याचं, वसुली करण्याचं राज्य चालवत आहे, असे म्हणत फडणवीसांनी राज्य सरकारवर निंदनीय टीका केली.

(हेही वाचा – आजारी मुख्यमंत्री, आजारी सरकार! नारायण राणेंचा हल्लाबोल)

राज्यात राजकारणाचे गुन्हेगारीकरण

राज्यात आज राजकारणाचे गुन्हेगारीकरण झाले आहे. राज्यात दहशतवाद्यांशी व्यावसायिक संबंध ठेवले जात आहे. आज जिल्ह्या-जिल्ह्यात मंत्री, आमदार, खासदारांचे अवैध रेती, अवैध दारूचं नेक्सस सुरु आहे. या सगळ्यांमध्ये राज्यातील सत्ताधाऱ्यांना शेतकऱ्यांकडे पाहायला कुणीही तयार नाही. एका मुलीवर ४०० लोकं बलात्कार करतात, काय चालले आहे महाराष्ट्रात… सरकार सांगतं आम्ही शक्ती कायदा करु. पण सरकारमध्ये केवळ ‘भक्ती’ उपक्रम चालू आहे, असा हल्लाबोल फडणवीसांनी केला आहे.

नांदेड, अमरावती, मालेगावातील घटना साधी नाही तर…

नांदेड, अमरावती, मालेगावात घडलेली घटना साधी नाही तर हा एक प्रयोग आहे. देशात अराजक निर्माण करण्यासाठी, केंद्र सरकारविरोधात विचारपूर्वक केलेला प्रयोग आहे. 26 ऑक्टोबरला बांग्लादेशात हिंदूंवर अत्याचार होतो. त्याचा निषेध म्हणून त्रिपुरात मोर्चा निघतो. 28 ऑक्टोबरला सोशल मीडियावर पोस्ट पसरवल्या जातात. दिल्लीतील एका रेफ्युजी कँपला लागलेल्या आगीचा फोटो दाखवून त्रिपुरात कुराण जाळण्यात आल्याचे सांगितले जाते. जुन्या मिरवणुकीचे फोटो दाखवून हिंदू मोठ्या प्रमाणात मुस्लिमांवर अन्याय करत असल्याचा आरोप केला जातो. त्यानंतर लगेच 11 नोव्हेंबरला नांदेड, अमरावती, मालेगावात मुस्लिमांचे मोर्चे निघतात. हे सर्व राज्य सरकारच्या समर्थनातून निघालेले मोर्चे, आंदोलनं आहेत, असा गंभीर आरोप देखील यावेळी फडणवीस यांनी केला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.