‘उद्या त्यांचं सरकार आलं तर मी त्यांना गुरुमंत्र देईन’, फडणवीसांचं पवारांना प्रत्युत्तर

98

राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर शनिवारी राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची नियुक्ती करण्यात आली. यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सहा जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. यावरुन विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी फडणवीसांवर जोरदार टीका केली. त्याला आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चोख उत्तर दिले आहे.

माझ्याकडे केवळ एका पुणे जिल्ह्याचं पालकमंत्रीपद होतं तेव्हा तो एक जिल्हा सांभाळताना माझ्या नाकीनऊ येत होते, आता फडणवीसांकडे सहा जिल्ह्यांचं पालकमंत्रीपद असून ते या सर्व जिल्ह्यांचा कारभार कसा सांभाळणार, असा खोचक सवाल अजित पवार यांनी फडणवीसांना केला होता. त्याला देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

मी त्यांना गुरुमंत्र देईन

येत्या काळात कधी त्यांचं राज्य आलंच आणि त्यांच्याकडे दोन-तीन जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी आली तर ती कशी पार पाडायची याचा गुरुमंत्र मी अजित पवार यांना नक्की देईन. मात्र नियोजन मंत्री म्हणून हे जिल्हे माझ्याकडे आहेत. आणि मी संपूर्ण महाराष्ट्र सांभाळला आहे, मग सहा जिल्ह्यांचं काय घेऊन बसलात, असा सवाल करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांना टोला लगावला आहे.

(हेही वाचाः ‘इतिहासातील खानांची उचकी लागणारे आता कुठल्या बिळात बसले आहेत?’, भाजपचा उद्धव ठाकरेंना खोचक सवाल)

दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, भंडारा, गडचिरोली या जिल्ह्यांचे पालकमंत्री असतील. नियोजन मंत्री म्हणून त्यांच्याकडे या जिल्ह्यांची जबाबदारी देण्यात आली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.