वादग्रस्त वक्तव्य टाळा, देवेंद्र भाऊंची भाजपच्या नेत्यांना तंबी

बाळासाहेबांशी निगडीत किंवा ज्यामुळे वाद निर्माण होऊ शकतो अशा टीका टाळा, अशी तंबीच भाजपच्या नेत्यांना देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

71

शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या दादर, माहिममध्ये येऊन भाजप नेते प्रसाद लाड यांनी वेळ आली तर शिवसेना भवन फोडू, असे चिथावणीखोर वक्तव्य केल्यामुळे शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले होते. प्रसाद लाड यांचे हे वक्तव्य भाजपमधील वरिष्ठांना देखील पटले नाही. अशा वक्तव्यामुळे भाजपची प्रतिमा खराब होऊन शिवसेनेसोबतचा दुरावा अधिक वाढू शकतो. याचमुळे आता खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी टिका करा, पण पक्षाला अडचणीत आणणारी वक्तव्य करू नका, अशी तंबीच भाजपच्या नेत्यांना दिली आहे. बाळासाहेबांशी निगडीत किंवा ज्यामुळे वाद निर्माण होऊ शकतो अशा टीका टाळा, अशी तंबीच भाजपच्या नेत्यांना देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

दरम्यान प्रसाद लाड यांच्या वक्तव्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी देखील तोडफोड करणे ही भारतीय जनता पक्षाची संस्कृती नाही. प्रसाद लाड यांनी आपला व्हिडिओ काढून स्पष्टीकरण दिले आहे. आमच्यासाठी हा विषय संपलेला असल्याची माध्यमांना प्रतिक्रिया दिली होती.

(हेही वाचाः आपण मुख्यमंत्री नाही, हे राज्यपालांना कळायला हवं! नवाब मलिकांची टीका)

लाड यांच्या मदतीला त्यांचे मित्रही धावले

प्रसाद लाड यांच्या वक्तव्यानंतर शिवसैनिकांचा रोष सोशल मीडियावर व्यक्त होत असताना, त्यांचे मित्र आणि उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर हे देखील त्यांच्या मदतीला धावून आले. प्रसाद लाड यांच्या वक्तव्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रचंड नाराज झाले होते. त्याचमुळे मिलिंद नार्वेकर यांनी प्रसाद लाड यांना फोन केल्याची माहिती मिळत आहे. मिलिंद नार्वेकर आणि प्रसाद लाड यांची राजकारणा पलीकडे मैत्री असल्याने, आपला हा मित्र त्याच्या वक्तव्यामुळे शिवसैनिकांच्या रडारवर येऊ नये, म्हणून नार्वेकरांनीच थेट पुढाकार घेत वाद मिटवण्याचा प्रयत्न केल्याचे आता बोलले जात आहे.

काय म्हणाले होते लाड?

भाजपच्या दादर येथील कार्यालयाचे आमदार नितेश राणे, आमदार प्रसाद लाड यांच्या उपस्थितीत 31 जुलै रोजी उद्घाटन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमादरम्यान बोलताना प्रसाद लाड यांनी वाद निर्माण करणारे वक्तव्य केले होते. दक्षिण-मध्य मुंबईत कोणताही मोर्चा असेल तिथे आम्ही येणार आहोत. मोर्चाला आम्ही आल्यावर तिथे कुणी थांबणार नाही. सेनेच्या कुंडल्या आमच्याजवळ आहेत, असा इशारा प्रसाद लाड यांनी शिवसेनेला दिला. तसेच “शिवसेनेला वाटतं की आम्ही माहिममध्ये आल्यावर सेनाभवन फोडू, तर त्यांना सांगतो की वेळ आली तर तेही करू,” असं चिथावणीखोर वक्तव्य प्रसाद लाड यांनी केलं होतं. तेव्हा वाद पेटल्यानंतर भाजप आमदार प्रसाद लाड यांनी मी केलेल्या भाषणाचा विपर्यास केला गेला असल्याचं म्हणत, सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.

(हेही वाचाः तुम्हीच लिहा स्वातंत्र्यदिनाचे माझे भाषण! मोदींचे जनतेला ‘हे’ आहे आवाहन!)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.