दसरा मेळावा वाद : महापालिका म्हणते, शिवाजी पार्क आमच्या मालकीचे, दोन्ही गटाला परवानगी नाकारली!

137

मागील ५६ वर्षांपासूनची शिवसेना आणि शिवाजी पार्क येथे दसरा मेळावा अशी परंपरा आहे. मात्र यंदाच्या वर्षी शिवसेनेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उभी फूट पाडली आहे. त्यामुळे शिंदे गटाने शिवसेनेवर दावा केला आहेच, त्यासोबत शिवाजी पार्कवर होणाऱ्या दसरा मेळाव्यावरही दावा केला आहे. शिवाजी पार्कात हा मेळावा घेण्यासाठी परवानगी मिळावी असा अर्ज उद्धव ठाकरे आणि शिंदे गट या दोघांनी महापालिकेत अर्ज केला, मात्र मुंबई महापालिकेने कायदा आणि सुव्यवस्थेच्या कारणावरून दोन्ही गटाला परवानगी नाकारली. या प्रकरणी उद्धव गटाने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यासोबत शिंदे गटानेही न्यायालयात धाव घेतली. त्यावर शुक्रवारी, २३ सप्टेंबर रोजी सुनावणी झाली. त्यावेळी उद्धव गटाच्या वतीने वकील आस्पी चिनॉय यांनी युक्तीवाद केला, तर महापालिकेच्या वतीने वकील मिलिंद साठे यांनी युक्तीवाद केला, तर शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांच्या वतीने वकील जनक द्वाकरादास यांनी युक्तिवाद केला. यावेळी शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांची हस्तक्षेप याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली.

(हेही वाचा दसरा मेळावा वाद, शिंदे गटाला धक्का; सदा सरवणकरांची याचिका फेटाळली)

महापालिकेने काय केला युक्तीवाद? 

मुंबई महापालिकेचे वकील मिलिंद साठे म्हणाले, याचिकाकर्त्यांच्या कोणत्या अधिकाराच्या नियमांचे उल्लंघन झाले आहे? शिवाजी पार्क हे खेळाचे मैदान आहे आणि ते ‘सायलेंट झोन’मध्ये आहे. त्या मैदानाची मालकी महापालिकेकडे आहे. त्यांच्याकडे अर्ज करण्यात आला आहे. २०१० मध्ये उच्च न्यायालयाने त्या परिसराला शांतता क्षेत्र म्हणून घोषित केले आहे आणि तसेच खेळाशिवाय मैदानाच्या वापरावर निर्बंध घातले आहेत. महापालिकाच्या निर्णयाला विकृत कसे म्हणू शकतात? आम्ही कुणालाही परवानगी दिलेली नाही. सर्वांना केवळ शांततापूर्ण मार्गाने एकत्रित येण्याचा अधिकार आहे. विशिष्ट मैदानावर रॅली घेण्याचा अधिकार नाही. त्यामुळे ते एका विशिष्ट मैदानाचा आग्रह करू शकत नाही. त्यांच्या बोलण्याच्या अधिकारावर कुणीही रोख लावली नाही किंवा त्यांना एकत्रित येण्याचा अधिकारही नाकारलेला नाही, असा युक्तिवाद वकील साठे यांनी केला. असे असले तरी न्यायालयाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ६ डिसेंबर, महाराष्ट्र दिनी १ मे रोजी, प्रजासत्ताक दिनी २६ जानेवारीला आणि दसरा रॅलीला कार्यक्रमांचे आयोजन केले जाऊ शकते, असे म्हटले होते. २०१६ च्या राज्य सरकारच्या परिपत्रकानुसार, शिवाजी पार्कचा वापर वर्षातून केवळ ४५ दिवस खेळ सोडून इतर कारणांसाठी होईल. ४५ पैकी ११ दिवस हे मैदान खासगी संघटना किंवा व्यक्तींना देता येऊ शकते, असे वकील साठे म्हणाले.

(हेही वाचा अनेक वर्षे शिवसेना शिवाजी पार्कात दसरा मेळावा घेते, तो आमचा अधिकारच! – उद्धव गटाचा उच्च न्यायालयात युक्तीवाद)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.