ED ने राऊतांना बजावले दुसरे समन्स, १ जुलैला हजर राहण्याचे निर्देश

73

शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांना सोमवारी ईडीने समन्स बजावले होते. जमीन घोटाळ्याप्रकरणी संजय राऊतांना ईडीने समन्स पाठवले. मात्र, संजय राऊत ईडीसमोर चौकशीला हजर झाले नाहीत. त्यामुळे आता पुन्हा एकदा संजय राऊत यांना ईडीने दुसरं समन्स बजावले आहे. ईडीने राऊतांना हे समन्स बजावत १ जुलै रोजी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितलं आहे.

राज्यात राजकीय सत्तासंघर्ष पराकोटीला पोहोचला असताना राऊतांना ईडीने हे समन्स बजावले आहे. पत्राचाळ जमीन खरेदी घोटाळा प्रकरणी त्यांना हे समन्स बजावण्यात आले आहे. दरम्यान, राऊतांना चौकशीला हजर राहण्याचे आदेशही देण्यात आले होते. मात्र राऊतांनी अलिबाग मेळावा आणि अन्य काही कारणास्तव चौकशीला हजर राहणार नसल्याचे सांगितले होते. तसेच उत्तर दाखल करण्यासाठी मुदत वाढवून द्यावी अशी विनंती देखील केली होती. त्यानंतर राऊतांच्या वतीने त्यांचे वकील ईडी कार्यालयात हजर झाले होते.

(हेही वाचा – यंदा आषाढीची महापूजा फडणवीसच करणार, भाजप खासदाराचा दावा)

काय आहे प्रकरण?

मुंबईतील १ हजार ३९ कोटींच्या कथित पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रविण राऊत यांची चौकशी होऊन त्यांना अटक करण्यात आली होती. त्यासंदर्भात करण्यात आलेल्या तपासात याच घोटाळ्यातील पैसा अलिबागमधील मालमत्ता खरेदी करण्यासाठी वापरण्यात आल्याचा संशय ईडीला आहे. याच संदर्भातील चौकशीसाठी राऊत यांना ईडीने समन्स पाठवले आहे. उद्या म्हणजेच २८ जून रोजी सकाळी ११ वाजता मुंबईतील ईडीच्या कार्यालयामध्ये राऊत यांना उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

ईडीने आधीच जप्त केलेत ९ फ्लॅट
याचवर्षी एप्रिल महिन्यामध्ये ईडीने या प्रकरणात संजय राऊत यांच्या अलिबागमधील ८ प्लॉट आणि मुंबईतील एका फ्लॅटवर जप्तीची कारवाई ईडीने केली होती. ईडीने यापूर्वी ११ कोटी १५ लाख ५६ हजार ५७३ रुपयांची स्थावर मालमत्ता या प्रकरणामध्ये जप्त केली आहे. मनी लॉण्ड्रींग कायदा २०२२ अंतर्गत गोरेगावमधील पत्रावाला चाळ पुर्निविकास प्रकल्पामध्ये ‘मे. गुरू-आशीष कन्स्ट्रक्शन्स’ने केलेल्या आर्थिक घोटाळ्यासंदर्भात ही कारवाई करण्यात आली. ही संपत्ती ‘मे. गुरू-आशीष कन्स्ट्रक्शन्स’चे माजी निर्देशक प्रवीण राऊत यांच्या मालकीची पालघर, सफाळे, पडघा येथील जमिनींबरोबरच दादरमधील वर्षा राऊत (संजय राऊत यांच्या पत्नी) यांचा फ्लॅट आणि अलिबामधील किहिम समुद्रकिनाऱ्यावरील वर्षा राऊत आणि स्वप्ना पाटकर (सुजित पाटकर यांच्या पत्नी) या दोघींची एकत्रित मालकी असणाऱ्या जमिनीचा समावेश आहे. अलिबागमध्ये भूखंड खरेदी केलेल्या भूखंडांची किंमत साधारणतः ६० लाखांच्या आसपास असल्याचे सांगितले जाते. तसेच स्थानिक लोकांना धमकावून हे भूखंड कमी पैशात खरेदी करण्यात आले, असाही आरोप आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.