उद्धव ठाकरेंच्या भावनिक आवाहनाला एकनाथ शिंदेंचे वास्तववादी उत्तर

107

एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटाच्या बंडाळीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबूक लाईव्ह करत शिवसैनिकांना भावनिक आवाहन केले होते. माझ्या माणसांना मी मुख्यमंत्रीपदी नको असेन तर मला समोर येऊन सांगा, मी माझ्या राजीनामा पदाचा राजीनामा द्यायला तयार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांच्या या भावनिक आवाहनाला आता एकनाथ शिंदे यांनी वास्तव सांगत उत्तर दिले आहे.

एकनाथ शिंदे यांनी ट्वीट करत महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवसैनिक कसा भरडला गेला, हे सांगताना शिंदे यांनी चार मुद्दे मांडले आहेत.

(हेही वाचाः मुख्यमंत्री कोरोनाग्रस्त असताना पवारांनी कशी घेतली भेट? चर्चांना उधाण)

एकनाथ शिंदे यांच्या ट्वीटमधील मुद्दे

  1. गेल्या अडीच वर्षात म.वि.आ. सरकारचा फायदा फक्त घटक पक्षांना झाला,आणि शिवसैनिक भरडला गेला.
  2. घटक पक्ष मजबूत होत असताना शिवसैनिकांचे – शिवसेनेचे मात्र पद्धतशीर खच्चीकरण होत आहे.
  3. पक्ष आणि शिवसैनिक टिकविण्यासाठी अनैसर्गिक आघाडीतून बाहेर पडणे अत्यावश्यक.
  4. महाराष्ट्रहितासाठी आता निर्णय घेणे गरजेचे.

असे सांगत एकनाथ शिंदे यांनी #HindutvaForever असा हॅशटॅग सुद्धा दिला आहे.

(हेही वाचाः मुख्यमंत्र्यांचे फेसबुक लाईव्ह! बंडखोर आमदारांशी केलेला असफल संवाद! )

उद्धव ठाकरे यांचे आवाहन

माझ्याच पक्षातल्या माझ्या माणसांना मी नको असेन तर मग काय करायचं? माझ्या लोकांना जर मी मुख्यमंत्रीपदी नको असेन तर त्यांनी ते सुरत आणि इतर ठिकाणी जाऊन बोलण्यापेक्षा मला समोर येऊन सांगायचं होतं. त्यांच्यापैकी एकाही आमदाराने मला सांगितलं की आम्हाला मुख्यमंत्रीपदी नको, तर मी आता माझा राजीनामा द्यायला तयार आहे. यावर जर कोणाचा विश्वास नसेल तर आज संध्याकाळपासून मी माझा मुक्काम वर्षावरुन मातोश्रीला हलवत आहे, असे सांगत उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना आवाहन केले होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.