अमेरिकेने तिथे राहत असलेल्या १०४ अवैध भारतीयांना सैन्यदलाच्या विमानातून भारतात परत पाठवले. त्याचे पडसाद गुरुवार, ६ फेब्रुवारी राज्यसभेत तीव्र स्वरूपात उमटले विरोधकांनी सरकारला संसदेत घेरले. त्यानंतर परराष्ट्रीय मंत्री एस जयशंकर (S Jaishankar) यांनी या कारवाईचे समर्थन करत मोठे विधान केले.
काय म्हणाले परराष्ट्र मंत्री जयशंकर?
राज्यसभेत अवैध स्थलांतरावर बोलताना परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर (S Jaishankar) म्हणाले, “जर एखाद्या देशाचे नागरिक परदेशात अवैधपणे राहत असतील, तर अशा प्रत्येक देशाने त्यांच्या नागरिकांना परत देशात घ्यायलाच पाहिजे. हे त्यांचे कर्तव्य आहे. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी अमेरिकेत अवैधपणे गेलेल्या भारतीयांच्या मुद्द्यावर संसदेच्या नियम २५१ अंतर्गत निवेदन दिले. यावेळी त्यांनी सांगितले की, ही कारवाई अमेरिकेच्या नियमांनुसार करण्यात आली आहे. अशी कारवाई यापूर्वीही करण्यात आली आहे. ही काही नवीन प्रक्रिया नाही.
परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर (S Jaishankar) यांनी गुरुवारी राज्यसभेत सांगितले की, निर्वासितांनी दिलेल्या माहितीच्या आधारे, भारतीयांना अवैधपणे देशाबाहेर पाठवण्यासाठी बनावट कागदपत्रे तयार करणाऱ्या एजंट आणि एजन्सींवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. अमेरिकेतून परत आलेल्या प्रत्येक भारतीयासोबत बसून ते अमेरिकेत कसे गेले, एजंट कोण होता याची चौकशी करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
अमेरिकेने काय कारवाई केली?
अमेरिकेत राहणाऱ्या १०४ अवैध भारतीय नागरिकांना घेऊन अमेरिकेचे लष्करी विमान अमृतसरमधील श्री गुरु रामदास जी आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचले होते. या स्थलांतरितांपैकी ३० जण पंजाबचे, हरियाणा आणि गुजरातचे प्रत्येकी ३३ जण, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशचे प्रत्येकी तीन जण आहेत, तर दोन जण चंदीगडचे आहेत. यामध्ये १९ महिला आणि १३ अल्पवयीन मुलांचाही समावेश आहे.
Join Our WhatsApp Community