सरकार अधिकाऱ्यांना ओळखण्यात अपयशी ठरले! आव्हाडांचा घरचा आहेर 

सध्या पोलीस दलाच्या बदनामीचा कट रचण्यात आला आहे. काही अधिकारी यामुळे संतप्त झाले आहेत, असे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड म्हणाले. 

102

राज्यातील पोलीस दलाची बदनामी करण्याचा जाणीवपूर्वक कट रश्मी शुक्ला यांनी रचला होता, जो आता समोर आला आहे. रश्मी शुक्ला यांनी जे फोन टॅपिंग केले आहे, याची सखोल चौकशी झाली पाहिजे, त्यातून खूप काही सत्य बाहेर येईल, असे सांगत सरकार खरे अशा अधिकाऱ्यांना ओळखण्यात अपयशी ठरेल, हे केवळ माझेच नाही, तर मंत्रिमंडळातील अन्य सहकाऱ्यांचेही मत आहे, अशा शब्दांत गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ठाकरे सरकारला घरचा आहेर दिला.

रश्मी शुल्कांच्या आरोपात तथ्य नाही! 

रश्मी शुक्ला यांनी मानसिक रोगातून तो अहवाल बनवला आहे. त्यात काहीही तथ्य नाही. वास्तुनिष्ठता नाही. हा पोलीस दलाच्या बदनामीचा कट आहे. हे फोन टॅपिंग जर बाहेर आले, तर तो या कटाचा दुसरा भाग असेल. काही अधिकारी यामुळे पोलीस दलाची बदनामी होत असल्याने संतप्त झाले आहेत, असेही मंत्री आव्हाड म्हणाले.

रश्मी शुक्ला यांना पैशाची ऑफर! 

रश्मी शुक्ला ही मानवी विकृती आहे. त्यांना पैशाची ऑफर देण्यात आली होती. त्यांनी जे आरोप केले आहेत, त्यातून काही साध्य होणार नाही. यावर मुख्यंमत्री, उपमुख्यमंत्री आणि ज्येष्ठ मंत्री यावर काय कारवाई करायची हे ठरवतील, असेही आव्हाड म्हणाले.

(हेही वाचा : कोरोना गंभीर, पण राजकारणी राजकारणात खंबीर!)

टाटा रुग्णालयासाठी म्हाडाचे १०० फ्लॅट! 

मुंबईतील टाटा कॅन्सर रुग्णालयात राज्यासह देशभरातून हजारो रुग्ण येतात. त्यांच्यातील अनेकांना निवासाची सोय नसल्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना अनेकदा रस्त्यावर, फूटपाथवर रात्र काढावी लागल्याचे आपण पाहिले किंवा ऐकले असेल. पण आता ती वेळ येणार नाही. कारण, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या संकल्पनेतून ‘म्हाडा’ने आपले 100 प्लॅट्स टाटा कॅन्सर हॉस्पिटलला देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कॅन्सरग्रस्तांचे नातेवाईक फूटपाथ, कोपऱ्यावर कुठेही झोपलेले असतात. त्यामुळे मानवतेच्या दृष्टीने म्हाडाचे 100 प्लॅट्स टाटा कॅन्सर सेंटरला देत आहोत. पुढे ही संख्या 200 होईल. प्लॅट्स देण्याचा विचार आणि निर्णय ही संपूर्ण प्रक्रिया अवघ्या 7 दिवसांत झाली याचा गर्व असल्याचे यावेळी आव्हाड म्हणाले. म्हाडाने प्लॅट्सच्या चाव्या दिल्यानंतर आता सर्व जबाबदारी ही टाटाची असेल. त्यात कुठल्याही प्रकारचा राजकीय हस्तक्षेप होणार नाही, असा विश्वासही जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.