मुंबई प्रतिनिधी:
“मी घेतलेल्या कोणत्याही विकास प्रकल्पांना स्थगिती देत नाही, कारण मी उद्धव ठाकरे नाही,” अशा तीव्र शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला. राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला विधानसभेत उत्तर देताना त्यांनी स्पष्ट केले की, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (DCM Eknath Shinde) मुख्यमंत्री असताना घेतलेल्या निर्णयांना स्थगिती दिल्याच्या बातम्यांमध्ये कोणतेही तथ्य नाही. (Devendra Fadnavis)
“शिंदेंच्या निर्णयांची जबाबदारी आमचीही”
फडणवीस यांनी सांगितले की, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना ते स्वतः आणि उपमुख्यमंत्री अजित पवारही निर्णय प्रक्रियेत सामील होते. त्यामुळे कोणत्याही निर्णयाची जबाबदारी केवळ शिंदेंची नसून, तिघांची आहे. “मंत्रालयीन किंवा विभागीय स्तरावर काही ठराव स्थगितीला गेले असले तरी ते माझ्या आदेशावर नव्हे, मात्र तरीही माध्यमांमध्ये माझ्याविरोधात चुकीची माहिती पसरवली जाते,” असेही त्यांनी ठणकावून सांगितले.
(हेही वाचा – Dnyanjyoti Savitribai Phule Award : महिला सबलीकरण व शिक्षण क्षेत्रातील कार्यासाठी राज्यातील सहा महिलांचा सन्मान होणार )
जयंत पाटलांवर मिश्किल टोला
चर्चेदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शप गट) नेते जयंत पाटील (Jayant Patil) यांनी काही प्रतिक्रिया दिली असता, फडणवीसांनी त्यांना चिमटा काढत म्हटले, “जयंतराव, तुमचा प्रॉब्लेम आहे – तुम्ही चुकीच्या वेळी चुकीच्या ठिकाणी असता! तुम्ही ना अजितदादांचे ऐकता, ना माझे!” या वाक्यावर सभागृहात हशा पिकला. त्यानंतर त्यांनी सुरेश भट यांच्या ओळी उद्धृत करत वातावरण अधिक रंगतदार केले.
“आपले काही नेते गुजरातचे अँबेसेडर!”
विरोधकांना लक्ष्य करताना फडणवीस म्हणाले, “महाराष्ट्रातील काही नेते सतत गुजरातला पुढे ठेवतात, त्यामुळे आता गुजरातला स्वतःची जाहिरात करण्याचीही गरज नाही. पण त्यांनी हे लक्षात ठेवावे की, गेल्या १० वर्षांतील सर्वाधिक परकीय गुंतवणूक फक्त ९ महिन्यांत महाराष्ट्राने मिळवली आहे. २०२४-२५ या आर्थिक वर्षाच्या पहिल्या ९ महिन्यांत महाराष्ट्रात तब्बल १,३९,४३४ कोटी रुपयांची गुंतवणूक आली आहे. हा आकडा गुजरात, दिल्ली आणि कर्नाटक या तिन्ही राज्यांच्या एकत्रित गुंतवणुकीपेक्षाही अधिक आहे.”
(हेही वाचा – Veer Savarkar यांना भारतरत्न देण्याची BJP आमदाराची मागणी)
दावोसमध्ये महाराष्ट्राचा डंका
वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या दावोस परिषदेत (Davos Conference) महाराष्ट्राने भव्य गुंतवणूक आकर्षित केली असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. “जेव्हा एखादे राज्य १६ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आकर्षित करते, तेव्हा त्याचा डंका संपूर्ण जगभर वाजतो. महाराष्ट्राच्या पॅव्हिलियनबाहेर उद्योगपतींची गर्दी होती. मात्र, विरोधक आम्हाला दोष देतात की आम्ही भारतीय कंपन्यांशीच करार केले. पण आदित्य ठाकरे जेव्हा दावोसला गेले होते, तेव्हाही बऱ्याच कंपन्या भारतीय होत्या. विशेष म्हणजे, त्यातील अनेक कंपन्या नंतर प्रकल्पातून माघारी गेल्या,” असे फडणवीस म्हणाले.
“गुलाबी जॅकेट दादांनीच शिवून दिले”
मुख्यमंत्री फडणवीस सभागृहात गुलाबी रंगाचे जॅकेट घालून आले होते. यावरून काही सदस्यांनी टोमणे मारले. यावर फडणवीस मिश्किलपणे म्हणाले, “हे गुलाबी जॅकेट मला अजितदादांनीच शिवून दिलंय!” त्यांच्या या वक्तव्यावर संपूर्ण सभागृहात एकच हशा पिकला.
(हेही वाचा- Blood Test Camp : रचना आर्टस अँड क्रिएशन्सच्या वतीने स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात होणार रक्त तपासणी शिबीर)
महाराष्ट्र नंबर वन – फडणवीसांचा दावा
फडणवीस यांनी विधानसभेत (Budget Session) स्पष्ट केले की, महाराष्ट्र अजूनही औद्योगिक आणि आर्थिक आघाडीवर देशात पहिल्या स्थानावर आहे. “महाराष्ट्र उद्योग, रोजगार आणि परकीय गुंतवणुकीच्या बाबतीत देशात क्रमांक एकवर आहे. विरोधक कितीही नकारात्मकता पसरवत असले तरी सत्य वेगळे आहे,” असे ते म्हणाले. यामुळे विधानसभेत रंगतदार चर्चा रंगली आणि महाराष्ट्राच्या विकासावर सरकारचा भर असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुन्हा एकदा अधोरेखित केले.
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community