मंत्र्याचा जावई गांजा विकू शकतो, मग शेतकरी का नाही? सदाभाऊ खोतांचा थेट पवारांना सवाल

हर्बल तंबाखूच्या लागवडीसाठी आसुसलेल्या शेतकऱ्यांना आपण तात्काळ परवानगी मिळवून द्यावी. जेणेकरून महाराष्ट्रातील गरीब शेतकरी व कष्टकरी शेतमजूर नवाब मलिक यांच्या जावयासारखा श्रीमंत होईल, असे सदाभाऊ खोत पत्रात म्हणाले.

92

मंत्री नवाब मलिक यांचे जावई मौल्यवान हर्बल तंबाखूतून श्रीमंत झाल्याचे पाहून महाराष्ट्रातील अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना आशेचे किरण दिसू लागले आहेत. या हर्बल तंबाखूच्या लागवडीसाठी आसुसलेल्या शेतकऱ्यांना आपण तात्काळ परवानगी मिळवून द्यावी. जेणेकरून महाराष्ट्रातील गरीब शेतकरी व कष्टकरी शेतमजूर नवाब मलिक यांच्या जावयासारखा श्रीमंत होईल, अशी मागणी महाराष्ट्र विधान परिषदेचे आमदार सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादीचे पक्षप्रमुख शरद पवार यांना एक पत्र लिहून केली.

शेतक-यांना तुटपुंजी मदत

आपल्या नेतृत्वाखाली राज्यात महाविकास आघाडीचे सरकार काम करीत आहे. कोरोना काळात कसाबसा टिकून राहिलेला शेतकरी अतिवृष्टी, चक्रीवादळ आणि महापूर अशा अस्मानी संकटात सापडून मरणप्राय वेदना भोगत आहे. आपल्यासारखे शेतीतील जाणते गुरु असूनही महाविकास आघाडी सरकारने आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत केल्याने अनेक शेतकरी गळफास लावून आत्महत्या करत आहेत. शेती अक्षरशः परवडेनाशी झाली आहे, असे त्यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.

गांज्याची शेती करण्याची मिळावी परवानगी

सरकार मदत करत नाही हे बघून अनेक शेतकऱ्यांना गांजा सारखे पीक घ्यावे असे वाटू लागले आहे.  गांजा ही एक जगात कायम मागणी असलेली वनस्पती (हर्बल) आहे. म्हणूनच सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील शिरापूर गावातील अनिल बाबाजी पाटील या शेतकऱ्याने आपल्या शेतात या मौल्यवान हर्बलची (वनस्पतीची) लागण करण्याची मागणी केली आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागातील अनेक शेतकऱ्यांना या मौल्यवान हर्बलची (वनस्पती) शेती करायची आहे. पण राज्यात गांज्यासारख्या मौल्यवान हर्बलची लागवड करायची असल्यास सरकारची परवानगी लागते. जी सहजासहजी मिळत नाही, असेही त्यांनी पुढे पत्रात म्हटले आहे.

शेतक-यांना द्यावी तात्काळ परवानगी

अलिकडे आपल्या नेतृत्वाखाली काम करत असलेल्या महाविकास आघाडी सरकारमधील एक वरीष्ठ मंत्री नवाब मलिक यांच्या जावयाकडे मौल्यवान हर्बल तंबाखू सापडल्याचे आपण सांगितले आहे. नवाब मलिक यांचे जावई या मौल्यवान हर्बल तंबाखूतून श्रीमंत झाल्याचे पाहून महाराष्ट्रातील अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना आशेचे किरण दिसू लागले आहेत. तरी आपणास नम्र विनंती आहे की, या हर्बल तंबाखूच्या लागवडीसाठी आसुसलेल्या शेतकऱ्यांना आपण तात्काळ परवानगी मिळवून द्यावी. जेणेकरून महाराष्ट्रातील गरीब शेतकरी व कष्टकरी शेतमजूर नवाब मलिक यांच्या जावयासारखा श्रीमंत होईल, असे सदाभाऊ खोत म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.