‘सामना’तून टीकास्त्र; मोदी-शहा हिटलर, तर केंद्रीय तपास यंत्रणा ‘या’ नाझी फौजा!

100

केंद्रातील भाजप सरकारवर सामन्याच्या अग्रलेखातून जोरदार टीका करण्यात आली आहे. मोदी आणि शहा हे हिटलर, तर ईडी आणि तपास यंत्रणांना नाझी फौजा संबोधण्यात आले आहे. केंद्रातील सरकारला हिटलर म्हणत, सामनाच्या अग्रलेखात 2024 मध्ये या हिटलरशाहीचा अंत होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. नवाब मलिकांना केलेल्या अटकेनंतर अग्रलेखातून ही आग ओकण्यात आली आहे.

लढत राहीन आणि जिंकेन

महाराष्ट्रात भाजपाचे सरकार येऊ नये  ही श्रींची इच्छा होती. 2024 साली केंद्रातून मोदी, शहा व त्यांच्या ‘नाझी’ फौजांचे पूर्ण पतन व्हावे ही श्रीरामाचीच इच्छा दिसते. महाराष्ट्रात आता एका विकृत बेहोशीत हवेत तलवारी चालवणारेही स्वतःच्याच तलवारीने घायाळ होतील. महाराष्ट्राचे ‘ठाकरे’ सरकार अशा हवेतील तलवारबाजीने पडणार नाही. एका कॅबिनेट मंत्र्यास गुंतवण्यासाठी जे कपट घडवले, तो लोकशाहीचा खून आहे. नवाब मलिक हे ईडीच्या कार्यालयातून हसत हसत बेडरपणे बाहेर आले व मूठ आवळून त्यांनी नारा दिला, खोटेपणापुढे झुकणार नाही, लढत राहीन व जिंकेन! हिटलरच्या नाझी फौजांचा पराभव अटळ आहे! असं या अग्रलेखातून सांगण्यात आले आहे.

मलिक निर्भय  आणि बेडर

नाझी भस्मासुराचा जसा उदय झाला, तसा अंतदेखील झाला हे सध्याच्या मस्तवाल राज्यकर्त्यांना लक्षात येऊ नये याचे आश्चर्य वाटते. केंद्रीय तपास यंत्रणा या नाझींच्या फौजांप्रमाणे सध्या काम करीत आहेत व आपल्या राजकीय मालकांचे बेकायदेशीर हुकूम मानीत आहेत. महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांच्या घरी गुरुवारी सकाळी ‘ईडी’ नामक नाझी फौजा’ पोहोचल्या व 2003 सालच्या एका प्रकरणात त्यांना अटक केली. 2003 साली नवाब मलिक यांनी एक जमीन खरेदीचा व्यवहार केला. तो संबंध दाऊद इब्राहिमशी जोडून मलिक यांच्यावर मनी लॉण्डरिंगपासून गैरव्यवहार, टेस्र फंडिंग असे अनेक गुन्हे दाखल केले आहेत. 2003 च्या व्यवहारात 2013 साली आलेला मनी लॉण्डरिंगचा कायदा लागू होत नाही. तरीही भाजपच्या नाझी फौजांनी नवाब मलिक यांना अटक केली व त्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला. मुंबईतील भाजपच्या काही लोकांनी रस्त्यावर येऊन तलवारी उपसल्या व धमक्यांची भाषणे केली. हा जल्लोष बहुधा यासाठी असावा की, मोदी-शहा यांच्या मनमानीविरुद्ध भारतीय जनता पक्षाच्या खोटेपणाचा रोज बुरखा फाडणा-या नवाब मलिक यांचा आवाज नाझी फौजांनी दाबला आहे. भाजपविरुद्ध सत्य बोलणा-यांना ईडी, सीबीआयच्या नाझी फौजा चिरडून टाकतील, असाच संदेश देण्यात आला आहे. नवाब मलिक हे निर्भय आणि बेडर आहेत. गेल्या काही वर्षात त्यांनी भाजपचा खोटारडेपणा उघडा पाडला आहे.

नवाज शरीफांना मिठी मारलेली चालते का?

समीर वानखेडे व त्यांची एनसीबी मधल्या काळात भारतीय जनता पक्षाची बटीक बनली होती. शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान यास क्रुझ पार्टीतील अमली पदार्थांच्या प्रकरणात अटक करताच त्या बनावट प्रकरणाचा पुरता पर्दाफाश करणारे नवाब मलिक होते व शेवटी वानखेडे नामक अधिका-यास जावे लागले. त्यामुळे भारतीय जनता पक्षाचा खरा चेहरा समोर आला. नवाब मलिक यांच्या जावयासही खोटया प्रकरणात अडकवून, दबाव आणला गेला होता. तरीही मलिक झुकले नाहीत व त्यांनी भाजप विरोधाची लढाई सुरूच ठेवली. या लढाईत आता भाजपने नेहमीप्रमाणे पाठीमागून वार केला व विजय झाल्याचा आव आणला. भाजपच्या लोकांनी मुंबईत तलवारी उपसल्या, पण त्यांनी इतिहासाचे भान ठेवले तर लक्षात येईल की, तलवार चालवणारे शेवटी तलवारीच्या घावानेच मरतात. फडणवीस यांनी तर मलिक यांना जेलमध्ये पाठविण्याचा पणच केला होता. फडणवीस म्हणतात, मलिक यांनी देशाच्या दुश्मनांशी व्यवहार केलाच कसा? हा प्रश्न चुकीचा नाही. दाऊद हा देशाचा दुश्मन आहेच, पण तसे नवाज शरीफही आहेत. इम्रान खानही आहेत. त्यांनीच दाऊदला लपवून ठेवले आहे. पण त्याच नवाज शरीफला भेटण्यासाठी व मिठी मारण्यासाठी पंतप्रधान मोदी हे खास पाकिस्तानला जाऊन आले. नवाज शरीफ यांच्याच काळात कारगील झाले होते. कश्मीरात आजही हत्यासत्र सुरू आहे व चीनचे घुसखोर मोदी सरकारला बाहेर काढता येत नाहीत. हीसुद्धा दुश्मनांशी हातमिळवणीच आहे. गुजरातमध्ये ऋषी अगरवाल नामक माणसाने राष्ट्रीय बँकांना 23 हजार कोटींना लुबाडले हीसुद्धा देशाशी दुश्मनी आहे. त्या अगरवालला वाचवणारे दाऊदपेक्षा मोठे असेच देशाचे दुश्मन आहेत. त्यावर कोणीच का बोलत नाही?

( हेही वाचा: दोन वर्ष खेळ झालेच नाही, तरी 10वी,12वीच्या विद्यार्थ्यांना मिळणार क्रीडा गुण? )

नवाब आणखी घातक ठरतील

नवाब मलिक यांना ज्या प्रकरणात अडकवले आहे. त्याचा फैसला न्यायालयात होईल. देशातला कायदा मेलेला नाही जनता झोपलेली नाही हे उद्या कळेल. सत्य बोलणा-यांचा गळा घोटणे ही मर्दानगी नव्हे| हिंमत असेल, तर पाकिस्तानात घुसून दाऊदला खतम करा, नाहीतर फरफटत हिंदुस्थानात घेऊन या. हे लोक बार्बाडोसमधून मेहुल चोक्सी या भगोड्यास आणू शकले नाहीत. तेथे दाऊदचे कायर केंद्रीय तपास यंत्रणांना आपले गुलाम करून ते मनमानी करीत आहेत. राजकीय विरोधकांना नामोहरम करीत आहेत. महाराष्ट्रात शरद पवार व त्यांचे कुटुंब उद्धव ठाकरे व त्यांचे कुटुंब, संजय राऊत व त्यांचे कुटुंब, अनिल परब, अनिल देशमुख इत्यादींवर बदनामी व खटल्याची कैची लावून विकृत आनंद साजरा करणे हे कसले राजकारणर नवाब मलिकाचे प्रकरण मागे पडेल अशी प्रकरणे भाजप नेत्यांच्या खात्यावर जमा आहेत. आज नाचणारे
तलवारी चालविणारे, खोटे आरोप करणारे भाजपचे पंटर्सही आयुष्यभर तुरुंगात जातील, अशी प्रकरणे उघड होत असताना ‘ईडी’च्या नाझी फौजा त्याकडे दुर्लक्ष करतात. नवाब मलिक यांना आत टाकले, ते केव्हातरी सुटतील. ते सुटतील तेव्हा ते भाजप व त्यांच्या नाझी फौजांसाठी अधिक धोकादायक ठरतील,असं सामन्याच्या अग्रलेखातून सांगण्यात आले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.