स्टार्टअपमध्ये भारताचा जगात तिसरा क्रमांक – पंतप्रधान नरेंद्र मोदी

125

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणावर सत्ताधारी-विरोधकांची चर्चा झाल्यानंतर मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण झाले. यावेळी मोदींनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आणि भारत करत असलेल्या प्रगतीबाबत माहिती दिली. स्टार्टअपमध्ये भारताचा जगात तिसरा क्रमांक असल्याचे पंतप्रधान मोदींनी यावेळी सांगितले.

पंतप्रधान मोदी नक्की काय म्हणाले?

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, ‘सध्या देश जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे. आज संपूर्ण जगात भारताबाबत सकारात्मकता आहे. ही देशासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे. १४० कोटी देशवासियांना अभिमान वाटत आहे, परंतु मला वाटते की, यामुळेही काही लोकांना दुःख होत आहे. त्यांनी आत्मपरीक्षण करावे.’

भारतात अस्थिरता नाही

पुढे मोदी म्हणाले की, ‘आज जगातील प्रत्येक विश्वासार्ह संस्था, प्रत्येक तज्ज्ञ, जो भविष्याचा अचूक अंदाज वर्तवू शकतो, या सर्वांच्या मनात आज भारताबद्दल खूप आशा आणि उत्साह आहे. याचे कारण भारतात अस्थिरता नाही. आपल्या शेजारीला काही देशांना महागाई, बेरोजगारी आणि अन्न अभावाचा सामना करावा लागत आहे. कठीण काळात भारत ही पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनली. महामारीच्या काळात १५०हून अधिक देशांमध्ये औषधे आणि लस वितरित केल्या आहेत.’ (हेही वाचा – २००४-२०१४ स्वतंत्र भारतातील सर्वात भ्रष्ट दशक; पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल)

गेल्या ९ वर्षात ९० हजार स्टार्टअप्स आले

‘आज अनेक देश उघडपणे भारताचे आभार मानतात आणि जागतिक व्यासपीठांवर भारताचे कौतुक करतात. भारतात जवळपास तीन दशके राजकीय अस्थिरता होती. आज आपल्याकडे स्थिर आणि निर्णायक सरकार आहे. निर्णायक सरकारमध्ये नेहमीच देशहिताचे निर्णय घेण्याची हिंमत असते. गेल्या ९ वर्षात ९० हजार स्टार्टअप्स आले आहेत. स्टार्टअपमध्ये आपण जगात तिसऱ्या क्रमांकावर आहोत,’ असे मोदींनी सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.