जगभरात महागाईने कळस गाठला आहे. देशातही महागाई दिवसेंदिवस वाढत आहे. देशात पाम, खाद्यतेलाच्या किमती उच्चांकी स्तरावरुन 30 टक्क्यांनी उतरल्या आहेत; तर कच्चे तेलही 18 टक्क्यांनी स्वस्त झाले आहे.
याचसोबत कच्च्या मालाच्या किमती कमी झाल्या आहेत. मात्र नफा कमवण्यासाठी उत्पादनांच्या किंमती कमी करण्यास कंपन्यांनी नकार दिला आहे.
किमती आणखी वाढणार
साबण, शॅम्पू, बिस्किटे आणि पॅकबंद ग्राहकोपयोगी उत्पादने तयार करणा-या कंपन्यांच्या उत्पादन खर्चात गेल्या काही महिन्यांपासून मोठी वाढ झाली होती. मात्र आता कच्चा माल स्वस्त झाला आहे. त्यामुळे दरामध्ये कपात करण्याची मागणी होत असतानाही, कंपन्यांनी त्यास नकार देत उत्पादनांच्या किमती आणखी वाढणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
( हेही वाचा: मागच्या अडीच वर्षांत आमदारांना अपमानास्पद वागणूक; बंडखोर आमदाराचे मुख्यमंत्र्यांना खरमरीत पत्र )
मार्जिनवर दवाब
पामतेलाचा वापर साबण, बिस्किटे आणि न्यूडल्स तयार करण्यासाठी होतो, तर कच्चे तेल डिटर्जंट आणि पॅकेजिंगसाठी महत्त्वाचे आहे. खाद्यतेल कंपन्यांनी किमतीत प्रति लिटर 15 ते 20 रुपयांनी कपात केली आहे. विप्रो कंझ्युमर केअरचे अध्यक्ष अनिल चुग यांनी म्हटले की, महागाई वाढल्याने एमजीसी कंपन्यांच्या मार्जिनवर मोठा दबाव आला आहे. यामुळे अशा स्थितीत कंपन्या किमती कमी करण्यासाठी तयार नाहीत. त्याचा फटका ग्राहकांना बसणार आहे.