काँग्रेसचे नेते जितिन प्रसाद भाजपमध्ये! उत्तर प्रदेशात काँग्रेसला झटका!

२०१९ लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेसमध्ये अध्यक्षपदापासून ते पक्षीय कार्यप्रणालीपर्यंत बदल करण्यात यावेत, अशी मागणी काँग्रेसच्याच २३ नेत्यांच्या गटाने केली होती. यामध्ये जितिन प्रसाद यांचा समावेश होता. 

64

काँग्रेसचे उत्तर प्रदेशातील वरीष्ठ नेते जितिन प्रसाद यांनी काँग्रेसला सोडून भाजपामध्ये प्रवेश केल्याने उत्तर प्रदेशात काँग्रेसला २०२२च्या विधानसभा निवडणुकीच्या आधी जोरदार झटका बसला आहे. दिल्लीतील भाजपाच्या मुख्यालयात केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या उपस्थितीत जितिन प्रसाद यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे आता काँग्रेससमोर मोठा पेच प्रसंग निर्माण झाला आहे. २०१९मध्ये काँग्रेसच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेणाऱ्या २३ नेत्यांमध्ये जितिन प्रसाद हे एक आहेत.

भाजप एकमेव राष्ट्रीय पक्ष!

काँग्रेसमध्ये राहून मी लोकांच्या हितांचे रक्षण करू शकत नाहीत, त्यांना मदत करू शकत नाही, हे जाणवले. गेल्या ३ दशकांपासून मी काँग्रेससोबत कार्यरत होतो. पण आज विचारपूर्वक हा निर्णय घेतला. भाजपा हाच राष्ट्रीय पक्ष आहे. बाकी पक्ष हे व्यक्तीकेंद्री आणि प्रादेशिक झाले आहेत. सध्या आपण ज्या परिस्थितीत आव्हानांचा सामना करत आहोत, त्यासाठी आज देशासाठी जर कुणी ठामपणे उभे आहेत, तर ते फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी, असे जितिन प्रसाद यांनी भाजपामध्ये प्रवेश करताना म्हणाले.

(हेही वाचा : वाघाशी दुश्मनी नव्हतीच! नेत्यांची आज्ञा असेल, तर दोस्ती करू! भाजपची सेनेला ऑफर )

काँग्रेसचे मतांचे गणित बिघडणार!

जितिन प्रसाद यांच्या भाजपा प्रवेशामुळे काँग्रेससाठी आगामी उत्तर प्रदेश निवडणुकांचा पेपर कठीण बनल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. जितिन प्रसाद हे उत्तर प्रदेशमधील एक प्रभावी नेते आहेत. विशेषत: काँग्रेससाठी ते उत्तर प्रदेशमधील ब्राह्मण चेहरा असल्यामुळे आता उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसचे मतांचे गणित बिघडण्याची शक्यता आहे.

कोण आहेत जितिन प्रसाद?

जितिन प्रसाद हे माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जितेंद्र प्रसाद यांचे पुत्र आहेत. २०१९च्या लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला होता. या निवडणुकीनंतर काँग्रेसमध्ये अध्यक्षपदापासून ते पक्षीय कार्यप्रणालीपर्यंत बदल करण्यात यावेत, अशी मागणी पक्षातील एका गटाने केली होती. जी-२३ असे या गटाला म्हटले गेले. या गटाने आपल्या शिफारशीवजा मागण्यांचे पत्रच सोनिया गांधी यांना सादर केले होते. या गटामध्ये जितिन प्रसाद यांचा समावेश होता.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.