मावळमधील गोळीबाराला पोलिस जबाबदार! पवारांनी केला आता खुलासा

लखीमपूरबाबत प्रतिक्रिया देताना मी जालियनवाला बाग हत्याकांड म्हणून उल्लेख केला. ज्याचे समोरच्या पक्षाला अधिक दु:ख झाले, त्यानंतर पाहुणे आमच्या घरी आले, असे शरद पवार म्हणाले.

84

लखीमपूर येथील तथाकथित शेतकरी हत्येवरून होणा-या आरोपांवर प्रतिवाद करताना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मावळ गोळीबाराचा उल्लेख करत तेव्हाच्या सरकारवर दोषारोप केला. त्याचा खुलासा करताना एनसीपीचे अध्यक्ष शरद पवार यांनी ‘मावळमध्ये शेतक-यांवर जो गोळीबार झाला होता, त्याला पोलिस जबाबदार होते, कोणताही राजकीय पक्ष याला कारणीभूत नव्हता’, असे पत्रकार परिषदेत म्हणाले.

देवेंद्र फडणवीस यांच्या ज्ञानात भर पडेल!

मावळ गोळीबाराच्या चौकशीतून पोलिस दोषी असल्याचे स्पष्ट झाले. आज त्याच मावळमध्ये जनतेला वस्तुस्थिती समजली आहे. म्हणूनच एनसीपीचा उमेदवार विधानसभेत ९० हजार मतांनी निवडून आला. यावरून मावळमध्ये जनतेने तिचा कौल स्पष्ट केला आहे, असेही पवार म्हणाले. माझ्या जिल्ह्यातील तालुका असल्यामुळे आपण सांगत आहे. मावळ तालुक्यात सातत्याने जनसंघ, नंतर भाजप होता. रामभाऊ म्हाळगी हे नेहमी मावळचे प्रतिनिधी होते, असेही पवार म्हणाले. मावळमध्ये लोकांना भडकावण्याचे काम कुणी केले हे लक्षात आल्यानंतर त्या मावळमध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत, हेही समजून घ्यावे लागेल. सुनील शेळके हे 90 हजाराच्या फरकाने निवडून आले आहेत. मावळमध्ये संताप असता तर एवढ्या फरकाने राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून आला नसता. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मावळची स्थिती समजून घेतली तर त्यांच्या ज्ञानात भर पडेल, असा टोलाही पवारांनी लगावला आहे.

(हेही वाचा : अमोल कोल्हेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र… केली ‘ही’ महत्त्वाची मागणी)

लखीमपूरला जालियनवाला बाग म्हटल्यावर पाहुणे घरी

लखीमपूर प्रकरणी महाराष्ट्रात बंद पुकारण्यात आला. तो शांततेत यशस्वी झाला. जनतेने त्याला पाठिंबा दिला, असेही पवार म्हणाले. लखीमपूरबाबत प्रतिक्रिया देताना मी जालियनवाला बाग हत्याकांड म्हणून उल्लेख केला. ज्याचे समोरच्या पक्षाला अधिक दु:ख झाले, त्यानंतर पाहुणे आमच्या घरी आले, असेही शरद पवार म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.