मनसेच्या ‘घे भरारी’ अभियानाच्या शुभारंभालाच मनसैनिकांची पाठ

106

आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने घे भरारी अभियानांतर्गत मुंबईतील विधानसभांमधील प्रभागांमध्ये जाहीर सभा घेण्यास सुरुवात केली. परंतु शुभारंभाच्या पहिल्याच दादरमधील सभेला मनसैनिकांनी पाठ फिरवल्याचे दिसून आले. दादर पश्चिम येथील केशवराव दाते मैदानातील पहिल्या शुभारंभाच्या सभेत केवळ दोनशे ते तीनशेच कार्यकर्ते उपस्थित होते. त्यामुळे मनसेला पुन्हा कार्यकर्त्यांची जमवाजमव करावी लागणार असल्याचे दिसून येत आहे.

mns 1

( हेही वाचा : भारतात दरवर्षाला २५ माणसे गमावतात हात, प्रत्यारोपणासाठी आर्थिक मदतीकरिता इन्शुअरन्स कंपन्यांचा नकार)

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा सध्या मुंबईत एकही आमदार नसून कुर्ल्यात एकमेव नगरसेवक होता. सन २०१७च्या महापालिका निवडणुकीत मनसेचे सात नगरसेवक निवडून आले होते. परंतु त्यातील दिलीप लांडे, परमेश्वर कदम, हर्षिला मोरे, अर्चना भालेराव, अश्विनी माटेकर आदी सहा नगरसेवक शिवसेनेत सामील झाल्यानंतर मुंबईत संजय तुर्डे हे एकमेव नगरसेवक उरले आहे. त्यामुळे मुंबईत पुन्हा एकदा मनसेला शुन्यापासून सुरुवात करावी लागत आहे. सन २०१२च्या निवडणुकीत मनसेचे सर्वाधिक नगरसेवक निवडून आले होते.

परंतु आगामी महापालिका निवडणुकीत मनसेला पुन्हा मजबूत उभे करण्यासाठी पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घे भरारी अभियान राबवून संपूर्ण मुंबईत रान निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. सर्व प्रभागांमध्ये पुन्हा एकदा मनसेची ताकद आजमावून घेण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या या घे भरारी अभियानाचा शुभारंभ एकेकाळी मनसेचा गड समजल्या जाणाऱ्या दादर-माहिम-प्रभादेवी या विधानसभा क्षेत्रात जाहीर सभा घेत याचा शुभारंभ करण्यात आला. दादर पश्चिम कुंभारवाडा येथील केशवराव दाते मैदानात ही जाहीर सभा शनिवारी रात्री पार पडली. या मैदानाची क्षमता ३०० ते ३५० खुर्चींची आहे. परंतु यामध्ये सर्व मैदानात खुर्च्यांची मांडणी केली असली तरी प्रत्यक्षात निम्म्या खुर्ची रिकाम्या होत्या.

दादर आणि माहिममधून सर्वांधिक गटाध्यक्षांची नेमणूक झालेली आहे. परंतु प्रत्यक्षात प्रत्येक गटाध्यक्षांसोबत एक जरी कार्यकर्ता उपस्थित राहिला असता तरी हे मैदान खचाखच भरले असते. परंतु पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते मोठ्याप्रमाणात उपस्थित न राहिल्याने मैदानात मांडणी केलेल्या अनेक खुर्च्या रिकाम्या दिसून येत होत्या.

दादर, माहिमच्या बालेकिल्ल्यात मनसेचे सैनिकांची गर्दी न जमल्याने गोरेगाव येथील नेस्कोमध्ये गटाध्यक्षांचा मेळाव्यात दिसणारी गर्दी आणि प्रत्यक्षात घे भरारी अभियानाच्या जाहीर सभेला न झालेली गर्दी ही मनसेसाठी चिंतेचा विषय आहे. त्यामुळे मनसेला पुन्हा एकदा कार्यकर्ता जमवण्यासाठी जोरदार प्रयत्न करावा लागणार असल्याचे स्पष्ट होत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.