Literacy Rate : पुण्यापेक्षा अकोला-अमरावतीत शिक्षणाचे प्रमाण जास्त!

119
Literacy Rate : पुण्यापेक्षा अकोला-अमरावतीत शिक्षणाचे प्रमाण जास्त!
  • सुजित महामुलकर

सध्या पुणे विविध कारणांनी देशभर गाजत आहे. कधी ‘ड्रंक एंड ड्राइव’ तर कधी ड्रग्स प्रकरण तर कधी कोयता गँग. त्यात आणखी एक भर पडत आहे, ती म्हणजे पुण्याचे घसरणारे साक्षरतेचे प्रमाण. पुणे जिल्ह्याचे साक्षरता प्रमाण हे अकोला, अमरावती, वर्ध्यापेक्षाही कमी असल्याचे राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालात स्पष्ट झाले आहे. (Literacy Rate)

महाराष्ट्रात सर्वाधिक साक्षर जिल्हा मुंबई उपनगर असून सगळ्यात कमी साक्षरता प्रमाण हे नंदुरबार जिल्ह्यात असल्याचे अहवालातून स्पष्ट झाले आहे. (Literacy Rate)

सर्वाधिक साक्षर मुंबई उपनगरात

जनगणना १९९१ नुसार राज्याचा साक्षरता दर (७ वर्ष व अधिक वयोगट) ६४.९ टक्के होता व त्यात वाढ होऊन जनगणना २०११ नुसार ८२.३ टक्के झाला. जनगणना २०११ नुसार, साक्षरता दर मुंबई उपनगर जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजेच ८९.९ टक्के तर नंदुरबार जिल्ह्यात सर्वात कमी ६४.४ टक्के इतका होता. शिक्षणाचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या पुणे जिल्ह्याचा साक्षरता दर ८६.२ टक्के, म्हणजेच मुंबई शहर (८९.२), उपनगर (८९.९), नागपूर (८८.४), वर्धा (८७), अमरावती (८७.४) आणि अकोला (८८.१) यांच्यापेक्षाही कमी आहे. २०२१ मध्ये जनगणना झाली नसल्याने सद्यस्थितीत हा दर काय आहे याची माहिती या पाहणी अहवालात देण्यात आली नाही. (Literacy Rate)

(हेही वाचा – Konkan Railway च्या ‘या’ गाड्या १ महिना एलटीटीऐवजी पनवेलपर्यंत धावणार, कोकण रेल्वे प्रशासनाने दिली माहिती)

महसूल विभागनिहाय आकडेवारी

तसेच राज्यातील महसूल विभागनिहाय आकडेवारी विचारात घेतली तर सहापैकी नागपूर या विभागात साक्षरतेचे प्रमाण सर्वाधिक ८४.४ टक्के आहे तर सगळ्यात कमी ६५.८ टक्के छत्रपती संभाजी नगर विभागात आहे. मुंबई तसेच उपनगर ज्या विभागात येते त्या कोकण विभागाचे साक्षरतेचे प्रमाण ७७.५ टक्के असून नागपूरनंतर दुसऱ्या क्रमांकावर हा विभाग आहे. (Literacy Rate)

मोठ्या राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र आघाडीवर

देशपातळीवरील आकडेवारी पाहिली तर मोठ्या राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र आघाडीवर असल्याचे दिसून येते. महाराष्ट्राचे साक्षरतेचे प्रमाण ८२.३४ टक्के असून उत्तर प्रदेश (६७.६८), बिहार (६१.८०), तामिळनाडू (८०.०९), गुजरात (७८.०३), राजस्थान (६६.११), कर्नाटक (७५.३६) यापेक्षा सरस आहे. तर साक्षरता प्रमाण महाराष्ट्रापेक्षा अधिक असलेल्या छोट्या राज्यात दिल्ली (८६.२१), गोवा (८८.७०), हिमाचल प्रदेश (८२.८०), केरळ (९४), मिझोरम (९१.३३) आणि त्रिपुरा (८७.२२) यांचा समावेश आहे. (Literacy Rate)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.